विशाळगड; सुभाष पाटील : शाहूवाडीतील २१ व पन्हाळा तालुक्यातील ४१ गावांना सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या कासारी मध्यम प्रकल्प २.७७ टीएमसीचा आहे. रविवारी (दि ६) रोजी सकाळी ७ वाजता धरणात ९३.३६ टक्के पाणीसाठा आहे. कासारी पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचे प्रमाण कमी अधिक असले तरी कासारी धरण 'ओव्हर फ्लो' च्या मार्गावर आहे. अशी माहिती कासारी धरण शाखा अभियंता एस.एस.लाड व आय.जी.नाकाडे यांनी दिली.
कासारी मध्यम प्रकल्प २.७७ टीएमसी असून सध्या धरणाची पाणीपातळी ६२२ मीटर इतकी आहे. धरणात ७३.३४ दलघमी इतका पाणीसाठा आहे. धरण २.५९ टीएमसी म्हणजे ९३.३६ टक्के भरले आहे. कासारी पाणलोट क्षेत्रात आजअखेर ३३०४ मिमी इतका पाऊस बरसला असून गतवर्षी २५५३ मिमी पाऊस झाला होता. गतवर्षीपेक्षा यंदा पाऊस जादा झाला आहे, हे या आकडेवारीवरून समोर येते. गेल्या २४ तासांत ६६ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. धरणातून १ हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू होता. पावसाचे प्रमाण कमी अधिक झाल्याने सध्या धरणातून २५० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
कासारी पाणलोट क्षेत्रात गेळवडे या प्रमुख मध्यम प्रकल्पासह कुंभवडे, केसरकरवाडी, पोबरे, पडसाळी व नादांरी हे लघु पाटबंधारे प्रकल्प येतात. हे पाचही लघू प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. गतवर्षी याच दिवशी पाणीसाठा ५९.४४ दलघमी इतका होता. तर धरण २.१० टीएमसी म्हणजे ७६ टक्के इतके भरले होते. गतवर्षीपेक्षा धरणात १७ टक्के पाणीसाठा जादा आहे. गेल्या २४ तासांत धरण क्षेत्रात ६६ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती पाटबंधारे विभागातून देण्यात आली.
हेही वाचा :