कोल्हापूर : माजी खासदार इम्तियाज जलील कोल्हापुरात आले, तर कोल्हापुरी पायताणाने ठोकून काढू, कोल्हापूर बंद ठेवू, असा इशारा सकल हिंदू समाजाचे गजानन तोडकर, सुनील सामंत, उदय भोसले, दीपक देसाई, शिवानंद स्वामी यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिला.
विशाळगडावरील घटना का घडली? येथे अतिक्रमणाला कोणी परवानगी दिली? अतिक्रमण काढण्यासाठी आंदरोलनाची वाट का पाहिली? असे प्रश्न त्यांनी केले. घडलेल्या घटनेला प्रशासनच सर्वस्वी जबाबदार आहे. अटक केलेल्या ‘त्या’ शिवभक्तांच्या पाठीशी सकल हिंदू समाज ठाम आहे, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून विशाळगडावर अतिक्रमणे आहेत. ती काढावीत, अशी मागणी शिवभक्त करत होते; पण प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे याकडे दुर्लक्ष झाले. अतिक्रमणे हटवण्यात टोलवाटोलवी केली आणि आंदोलनाची वाट प्रशासनाने का बघितली? असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. शिवभक्तांचा उद्रेक झाल्यानंतर सोमवारपासून विशाळगड अतिक्रमणमुक्त करण्यास सुरुवात झाली. वेळीच अतिक्रमणे काढली असती, तर ही वेळच आली नसती. शिवभक्तांवरील गुन्हे मागे घ्या, अटक केलेल्या शिवभक्तांना सोडा, शिवभक्तांवर एकतर्फी गुन्हे दाखल करू नयेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला निरंजन ढेरे, अर्जुन आंबी, मनोहर सोरप, योगेश केरकर, विशाल बोंगाळे यांच्यासह सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.