कोल्हापूर : शहरातील पूर पातळीत घट होत चालली आहे. जयंती नाल्यावरील पाणी ओसरल्याने सोमवारी त्यावरील वाहतूक सुरू झाली. Pudhari File Photo
कोल्हापूर

Kolhapur Flood | महापुराला ओहोटी; लोकांना दिलासा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : दोन दिवसांपासून थांबलेल्या पावसाने कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील पूर पातळीत घट होऊ लागली आहे. सोमवारी शहरातील पूर पातळीत फूटभर घट झाली. पूर ओसरत चालला असला, तरी शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अद्याप पुराचे पाणी आहे. शहरात जयंती नाल्यावरील पाणी कमी झाल्याने त्यावरील वाहतूक सुरू झाली. बालिंगा (ता. करवीर) येथील भोगावती नदीवरील पूल सायंकाळनंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. दोनवडे येथेही रस्त्यावर आलेले पाणी ओसरल्याने कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील वाहतूक आठवडाभरानंतर पूर्ववत सुरू झाली. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरही पाणी पातळी कमी होत असून, मंगळवारी (दि. 30) हा मार्गही वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.

पावसाने रविवारपासून उसंत घेतली आहे. सोमवारी शहर आणि परिसरात चांगली उघडीप दिली. दिवसभर कडकडीत ऊन पडले होते. सायंकाळी काही काळ पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यानंतर पुन्हा पावसाने विश्रांती घेतली. दोन दिवस पाऊस थांबल्याने शहरातील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. कोल्हापूर-आंबेवाडी मार्गावरही पाणी पातळी कमी झाली. आंबेवाडी-चिखली मार्गावरही पाणी कमी होत चालले आहे. अद्याप आंबेवाडी ते केर्ली या मार्गावर पाणी असल्याने कोल्हापूर-रत्नागिरी या मार्गावरील कोल्हापूर ते कोतोली फाटा ही वाहतूक बंदच आहे.

शहरात व्हीनस कॉर्नर परिसरातील पाणी कमी झाल्याने व्हीनस कॉर्नर ते कोंडा ओळ हा मार्ग खुला झाला. जयंती नाल्यावरील पाणी गेल्याने त्यावरून सकाळी एकेरी आणि दुपारनंतर दुहेरी वाहतूक सुरू झाली. शाहूपुरी परिसरासह बापट कॅम्प, मुक्त सैनिक वसाहत, जाधववाडी, काटे मळा, लक्षतीर्थ आदी परिसरात अद्याप नागरी वस्तीत पाणी आहे; मात्र त्याचीही पातळी कमी होत चालली आहे. स्थलांतरित झालेले नागरिक पाणी जसजसे कमी होईल, तसे घराकडे परतत आहेत. पाणी ओसरलेल्या ठिकाणी दुर्गंधीसह कचरा, गाळ पसरला आहे. महापालिकेच्या वतीने ठिकठिकाणी स्वच्छता केली जात आहे. तावडे हॉटेलजवळ पुलाखाली साचलेल्या पाण्यातून आजही वाहतूक सुरू होती.

सोमवारी सकाळी सहा वाजता पंचगंगेची पातळी 46.5 फुटांवर होती. दिवसभरात 12 तासांत त्यात नऊ इंचांनी घट झाली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत पाणी पातळी 45.8 फुटांपर्यंत खाली आली होती. रात्री दहा वाजता ती 45 फूट इतकी कमी झाली होती. पावसाचा जोर कमी झाला असला, तरी रविवारपासून पाणी पातळी संथगतीने कमी होत आहे. उद्या, मंगळवारपासून पाणी पातळीत वेगाने घट होईल, अशी शक्यता आहे.

सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत कडवी, चिकोत्रा, आंबेओहोळ ही तीन धरणे वगळता उर्वरित 13 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली; मात्र त्यानंतर दुपारी चार वाजेपर्यंत सर्वच धरण क्षेत्रांतील पावसाचा जोर कमी झाला आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे अद्याप खुलेच आहेत. त्यातून एकूण 4 हजार 356 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वारणेतून 12 हजार 285, तर दूधगंगेतून 8 हजार 100 क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणातून होणारा विसर्ग सुरूच असल्याने नद्यांची वाढलेली पाणी पातळी संथगतीने कमी होत आहे. यामुळे अद्याप 82 बंधारे पाण्याखाली आहेत. त्यामुळे नऊ राज्य मार्गांसह 44 प्रमुख जिल्हा मार्गही बंद आहेत. गडहिंग्लज-चंदगड मार्गावरील भडगाव पुलाजवळ रस्ता खचल्याने त्यावरील वाहतूक बंद आहे. जिल्ह्यात हातकणंगले, शिरोळ तालुक्यांत निर्माण झालेली पूरस्थिती कायम आहे.

दरम्यान, जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 18.1 मि.मी. पाऊस झाला. भुदरगड तालुक्यात सर्वाधिक 32.8 मि.मी. पावसाची नोंद झाली. हातकणंगलेत 6.6 मि.मी., शिरोळमध्ये 2.8 मि.मी., पन्हाळ्यात 25.8 मि.मी., शाहूवाडीत 26.1 मि.मी., राधानगरीत 21 मि.मी., गगनबावड्यात 29.3 मि.मी., करवीरमध्ये 18.7 मि.मी., कागलमध्ये 10.6 मि.मी., गडहिंग्लजमध्ये 11.9 मि.मी., भुदरगडमध्ये 32.8 मि.मी., आजर्‍यात 24.7 मि.मी., चंदगडमध्ये 25.7 मि.मी. पाऊस झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT