कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ले विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावा, यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने विशाळगडाच्या पायथ्याला महाआरती करण्यात आली आहे. विशाळगड अतिक्रमणावरून कोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. याची सुनावणी जलदगतीने व्हावी अशी मागणी या आरतीच्या निमित्ताने सरकारला करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज शिरीष महाराज मोरे म्हणाले की "किल्ल्यावर जवळजवळ 156 अनधिकृत अतिक्रमणे आहेत. यात तीन मजली मशीद आहे तसेच मलिक रेहान दर्ग्याचे अतिक्रमण सुद्धा आहे. पुरातत्व खात्याच्या अंतर्गत किल्ला असताना रायगडावरचे, राजगडावरचे एक दगड जरी हलवायचं म्हटलं तरी हजार परवानग्या शिवभक्तांना घ्यायला लागतात, मग ही अतिक्रमणे झाली कशी ? ही सगळी अतिक्रमणं त्वरित पाडली जावीत अशी सकल हिंदू समाजाच्या वतीने सरकारला मागणी आहे." राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागरभैय्या बेग यांनी यावेळी सरकारने गड किल्ले संवर्धनासाठी समितीला दिलेल्या 800 कोटी रुपयांच्या निधीतून काय कामे झाली, याचा हिशोब द्यावा आणि त्या समितीकडून सर्वच गडांवरील अतिक्रमणांचा पाठपुरावा करावा अशी मागणी केली.
यावेळी उपस्थित अनिकेत बांदल, हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष श्री नितीन शिंदे यांनीही संबोधित केले. यावेळी स्थानिक कार्यकर्ते महेश विभुते, मानसिंग कदम, विशाल पाटील, आकाश पवार, ओंकार कारंडे, रुपेश वारंगे, तुषार पाटील तसेच सकल हिंदू समाज व समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, कोल्हापूर जिल्हा समन्वयक अनिरुध्द कोल्हापुरे, दीपक देसाई, कुंदन पाटील, गजानन तोडकर, अनिल दिंडे, आनंदराव पवळ, सोहम कुऱ्हाडे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतून हजारो शिवभक्त आले होते.