Kolhapur Flood, NDRF
कोल्हापूरमधील पूरग्रस्त भागात एनडीआरएफकडून बचावकार्य सुरु आहे. ( Image- X)
कोल्हापूर

Kolhapur Flood | कोल्हापुरात प्रसंगी सैन्यदलाची मदत घ्या, मुख्यमंत्री शिंदेंची सूचना

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

कोल्हापुरात पुराचे पाणी (Kolhapur Flood) शिरल्याने महापुराची धास्ती वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शनिवारी (दि.२७) कोल्हापुरातील आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दिल्लीत निती आयोगाच्या बैठकीला जाण्यापूर्वी कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी चर्चा केली. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती, अतिवृष्टी, मदत आणि बचाव कार्याची मुख्यमंत्र्यांनी माहिती घेऊन आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबतची माहिती मुख्यमंत्री सचिवालयाने X वर पोस्ट करत दिली आहे.

अलमट्टी धरणातील विसर्गाबाबतही केली सूचना

कोल्हापुरात बचावकार्यासाठी आवश्यकता भासल्यास एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या पाठविण्यात याव्यात. प्रसंगी सैन्यदलाची मदत घेण्यात यावी. त्याचबरोबर अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.

पंचगंगेची पाणी पातळी ४७ फूट ५ इंचावर

कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात संततधार कायम आहे. यामु‍ळे धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे पंचगंगेच्या पाणी (Panchganga water level) पातळीत वाढ होत आहे. आज शनिवारी दुपारी १ वाजता पंचगंगेची राजाराम बंधाऱ्याजवळ पाणी पातळी ४७ फूट ५ इंच इतकी होती. तर ९८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

अनेक गावांचा संपर्क तुटला

गेल्या सात दिवसांपासून संथगतीने वाढणार्‍या पंचगंगेच्या महापुराचे पाणी शुक्रवारी सकाळी अखेर शहरातील (Kolhapur Flood updates) अनेक भागांत घुसले. यात प्रामुख्याने शाहूपुरी कुंभार गल्ली, व्हीनस कॉर्नर, मुक्त सैनिक वसाहतसह अनेक भागांचा समावेश आहे. सायंकाळी जयंती नाल्यावरील पुलावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. अजूनही या भागात पाणी आहे. राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे खुले असून, पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ सुरूच आहे. यामुळे शहराला बसलेला महापुराचा विळखा घट्ट होत चालला आहे. यामुळे नागरिकांची धास्तीही वाढत चालली आहे. जिल्ह्यातील पूरस्थितीही बिकट होत चालली असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

SCROLL FOR NEXT