कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा: बकरी ईदनिमित्त पशूची कुर्बानी देण्याच्या प्रथेमध्ये कालानुरूप बदल व्हावा. या प्रथेला पर्याय म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या वतीने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, कोल्हापूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
इस्लाम धर्मात बकरी ईदच्या निमित्ताने कुर्बानी किंवा सर्वस्वाचा त्याग करण्याची शिकवण आहे. या निमित्ताने बकरे अथवा इतर प्राण्यांची कुर्बानी देण्याची प्रथाही पाळली जाते. आजच्या सामाजिक परिस्थितीत सर्व धर्मियांनी धार्मिक सण हे अधिकाधिक समाजाभिमुख व मानवतावादी करणे आवश्यक आहे. हाच विचार समोर ठेवून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा. शमशुद्दीन तांबोळी यांनी केले. महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती, राज्य सहकार्यवाह रामदास देसाई, प्रा. मोईन खान आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी मोहसिन मुल्ला, दिलदार मुजावर, इरफान जमादार, वासिम जमादार, नियाज अत्तार, गुलाब अत्तार, कृष्णात स्वाती, रामदास देसाई, निशांत सुनंदा विश्वास, रूपेश कुंडले, संदीप सावंत, राखी मटकर, चारुल चव्हाण, अमृता पवार, कपिल मुळे यांनी रक्तदान केले.
हेही वाचा