कृष्णात डोणे महाराज वाघापूरकर यांनी विविध क्षेत्रांबाबत भविष्यवाणी केली Pudhari
कोल्हापूर

Balumama Bhaknuk | जागतिक तणाव, राजकीय उलथापालथ, भारत - पाकिस्तान युद्ध : जाणून घ्या आदमापूर येथील डोणे महाराजांची भाकणूक

Balumama Bhandara Utsav 2026 | आदमापूर येथील भाकणुकीच्या कार्यक्रमात कृष्णात डोणे महाराज वाघापूरकर यांनी विविध क्षेत्रांबाबत भविष्यवाणी केली

पुढारी वृत्तसेवा

Krushnat Done Maharaj Bhaknuk 2026

प्रा. शाम पाटील

मुदाळतिट्टा : आदमापूर येथील बाळूमामा भंडारा उत्सवानिमित्त आयोजित भाकणुकीच्या कार्यक्रमात कृष्णात डोणे महाराज वाघापूरकर यांनी विविध क्षेत्रांबाबत भविष्यवाणी केली. या कार्यक्रमाला बाळूमामा देवालयाचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते. मराठी वर्षातील शेवटची भाकणूक असल्याने या कार्यक्रमाकडे भाविकांचे विशेष लक्ष लागले होते.

भाकणुकीदरम्यान जागतिक स्तरावर तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त करताना चीन आणि कोरिया हे देश भविष्यात जगासाठी धोकादायक ठरू शकतात, असे सांगण्यात आले. भारत-पाकिस्तानमध्ये मोठे युद्ध होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते, तसेच तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडण्याची शक्यता वर्तविण्यात आली. भारतीय सैनिक सीमेवर शौर्याने लढतील आणि पाकिस्तानचा काही भाग भारताच्या ताब्यात येईल, असेही भाकीत करण्यात आले. याशिवाय रेल्वे, मोटार आणि विमान अपघातांच्या घटनाही वाढू शकतात, असे सांगितले.

राजकारणातही मोठी उलथापालथ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मोठे पक्ष सत्तेपासून दूर राहतील, तर लहान पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरेल. काही राजकीय नेते मोठ्या घोटाळ्यांत अडकून तुरुंगात जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. देशात मोठ्या चळवळी उभ्या राहतील आणि नव्या कायद्यांची अंमलबजावणी होत राहील. समान नागरी कायदा लागू होण्याबाबतही संकेत देण्यात आले.

आर्थिक परिस्थितीबाबत बोलताना महागाई वाढून जनतेला मोठा त्रास सहन करावा लागू शकतो, असे सांगण्यात आले. सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ होईल, तर दरवाढीमुळे सामान्य माणसाचे जगणे कठीण होईल, असेही भाकीत करण्यात आले.

हवामान बदलाबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली. ऋतूंचे चक्र विस्कळीत होईल, अवकाळी पावसाचे प्रमाण वाढेल, तसेच काही भागात दुष्काळाची परिस्थिती निर्माण होईल. नद्या, तलाव आणि जलाशय आटण्याची शक्यता वर्तविण्यात आली. नद्यांना जोडण्याच्या प्रकल्पांना गती मिळेल, तर कर्नाटकातील एखाद्या जलाशयाला तडा जाऊन नुकसान होऊ शकते, असेही सांगण्यात आले. याशिवाय सुनामी, वादळ, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

भविष्यात जंगलातील प्राणी गावांकडे येतील आणि मानवी जीवनशैलीतही बदल होतील, असेही त्यांनी नमूद केले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार सुरू राहतील; मात्र भारतीय उत्पादनांना मागणी वाढेल, असेही भाकीत करण्यात आले.

धार्मिक आणि सामाजिक घडामोडींविषयी बोलताना संस्कृती आणि हिंदू धर्माला चांगले दिवस येतील, जगातील अनेक देश हिंदू धर्माची स्थापना करतील. भारत देश हिंदुराष्ट्र होईल. अनेक देशांत हिंदू संस्कृतीबद्दल आकर्षण वाढेल, असे त्यांनी सांगितले. तसेच पशुधनाचे महत्त्व वाढेल आणि दूध-दुग्धजन्य पदार्थांच्या किमती वाढतील, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला.

मानवाला अठरा प्रकारचे आजार होतील. विज्ञानाची प्रगती माणसासाठी घातक ठरेल .मानवाचे आयुष्य कमी होईल. बारा वर्षाची मुलगी आई बनेल. तरुण पिढी वाम मार्गाला जाईल. चंद्र सूर्याची आकस्मात टक्कर होईल, जगात तीन दिवस अंधार पडेल, जग दुनिया दिसणार नाही. माणूस काही दिवसांनी राहण्यासाठी आकाशातील तारे ग्रह या जागेचा शोध घेतील.

कार्यक्रमाच्या शेवटी भक्तांना धर्माचरण आणि सेवा यावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले. भविष्यात आदमापूर हे करवीर आणि पंढरपूरप्रमाणे मोठे धार्मिक केंद्र बनून येथे भाविकांची मोठी गर्दी होईल, असेही भाकीत करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT