दोनवडे : सलग दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भोगावती नदीला पूर आला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर महापुराची शक्यता आहे. मागील वर्षी पूर आल्याने प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव भोगावती नदीवरील बालिंगा-दोनवडे पुलावरील वाहतूक बंद केली होती. सध्या तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आज (गुरुवारी) दुपारनंतर कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील बालिंगा पुलावरून वाहतूक बंद करण्यात येण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्ह्याला वरदायीनी ठरलेले आणि राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचे प्रतीक असलेले ८.३६ टी.एम.सी. क्षमतेचे राधानगरी धरण निम्म्या जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्यासह कृषी औद्योगिक विकासाचा केंद्रबिंदू असलेले राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले. आज सकाळी १० वाजून ६ मिनीटांनी धरणाचा सहा नंबरचा दरवाजा खुला झाला असून या दरवाजामधून १४२८ व विजगृहातून १५०० क्युसेक्स, असा एकूण २९२८ क्युसेक्स विसर्ग भोगावती नदीपात्रात होत आहे. यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.