पुढारी मल्टीमीडिया टीम
सिंधुदुर्ग: कोकणच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसाठी येत्या ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होत आहे. माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजपच्या माध्यमातून आपली बालेकिल्ल्यावरील पकड मजबूत ठेवण्याचा प्रयत्न चालवला आहे. तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेने जिल्ह्यात जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. राणे कुटुंबाचं वर्चस्व असलेल्या सिंधुदुर्गात ठाकरेंची शिवसेना कशी टक्कर देते, यावर जिल्ह्याचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या एकूण ५० जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या जागांसाठी जिल्हभरातून एकूण ४१२ उमेदवार रिंगणात आहेत. तर पंचायत समित्यांच्या १०० जागांसाठीही चुरशीची निवडणूक होणार आहे. महायुतीमधील जागावाटपाच्या सूत्रानुसार भाजप ३२, तर शिंदेंची शिवसेना १८ जागांवर निवडणूक लढवत आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीने सर्वच्या सर्व ५० जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.
भाजपचा ‘बिनविरोध पॅटर्न’ जोमात, विरोधक कोमात
सिंधुदुर्ग हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा मूळ जिल्हा… इथं राणे पिता-पुत्रांच्या राजकीय व्यूहरचनेमुळे भाजपने मतदानापूर्वीच आपला दबदबा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या ५ आणि पंचायत समित्यांच्या ६ जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. त्यामध्ये भाजपच्या ५ तर शिंदेंच्या शिवसेनेच्या एकाचा विजय झालाय.
कोणत्या जागा बिनविरोध?
खारेपाटणमधून भाजपच्या प्राची इस्वलकर, देवगड तालुक्यातील पडेलमधून सुयोगी रवींद्र घाडी, बापर्डेमधून अवनी अमोल तेली आणि बांदा मतदारसंघातून प्रमोद कामत या भाजप उमेदवारांनी बाजी मारली आहे, तर जानवली जिल्हा परिषद गटातून शिंदे सेनेच्या रुहिता राजेश तांबे या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
पंचायत समिती गणांमध्येही महायुतीने सहाही जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले असून, हे सर्व उमेदवार भाजपचेच आहेत. यामध्ये कणकवली तालुक्यातील बिडवाडी गणातून संजना संतोष राणे आणि वरवडे गणातून राजेश (सोनू) सावंत यांचा समावेश आहे. देवगड तालुक्यात पडेलमधून अंकुश यशवंत ठूकरूल, नाडणमधून गणेश सदाशिव राणे आणि बापर्डे गणातून संजना संजय लाड यांनी बिनविरोध विजय मिळवला आहे. तसेच वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे गणातून साधना सुधीर नकाशे या देखील बिनविरोध निवडून आल्या आहेत.
राणे विरुद्ध ठाकरे संघर्ष
सिंधुदुर्गात सध्या 'महायुती' विरुद्ध 'महाविकास आघाडी' असा थेट सामना आहे. भाजप खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि शिंदे गट महायुतीत एकत्र आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली असून, 'विकास' हा त्यांचा मुख्य मुद्दा आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी आमदार वैभव नाईक आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी जिल्ह्यात सत्तापरिवर्तनासाठी कंबर कसली आहे. आंबोली सारख्या काही जागांवर स्थानिक समीकरणे जुळवून महाविकास आघाडीने महायुतीला पेचात पाडले आहे.
सिंधुदुर्गातील हा निकाल नारायण राणेंचे वर्चस्व अधोरेखित करणार की ठाकरे गट पुन्हा एकदा बाजी मारणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
सिंधुदुर्गातील राजकीय बलाबल
खासदार: नारायण राणे (भाजप - रत्नागिरी-सिंधुदुर्ग)
आमदार:
1. नितेश राणे (कणकवली, भाजप)
2. निलेश राणे (कुडाळ, शिंदेंची शिवसेना)
3. दीपक केसरकर (सावंतवाडी, शिंदेंची शिवसेना)
गेल्या निवडणुकीतील संख्याबळ
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत गेल्या निवडणुकीत नारायण राणे यांच्या तत्कालीन 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्षा'चे निर्विवाद वर्चस्व होते
• महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष (आता भाजपमध्ये): २७ जागा
• शिवसेना (अविभाजित): १६ जागा
• काँग्रेस: ०६ जागा
• भाजप: ०१ जागा
मुख्य कळीचे मुद्दे
१. सी-वर्ल्ड आणि पर्यटन: सी-वर्ल्ड प्रकल्पाला होणारा विरोध आणि पर्यटनातून निर्माण होणारा रोजगार हा मुख्य मुद्दा आहे.
२. कोकण रेल्वे आणि रस्ते: मुंबई-गोवा महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम आणि स्थानिकांचा संताप
३. राणे विरुद्ध ठाकरे: जिल्ह्याच्या राजकारणावर कोणाची हुकूमत राहणार, ही अस्मितेची लढाई
४. काजू-आंबा बागायतदार: काजू आणि आंब्याला मिळणारा भाव आणि प्रक्रिया उद्योगांची कमतरता यामुळे बागायतदार नाराज
५. ग्रामीण भागातील पाणी टंचाई
६. बिनविरोध निवडीचे राजकारण: भाजपने काही जागा बिनविरोध निवडून आणल्यात. भाजप धनशक्तीचा गैरवापर करत असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जातोय.