वेंगुर्ला ः वेंगुर्ला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सोमवारी थेट नगराध्यक्ष पदासाठी एकूण 3 उमेदवारी अर्ज करण्यात आले. तर नगरसेवक पदासाठी 16 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. एकूण थेट नगराध्यक्षसाठी 8 व नगरसेवक पदासाठी 113 असे एकूण 121 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आज सोमवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रीय काँग्रेसने शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे वेंगुर्लेमध्ये सुद्धा युतीप्रमाणे महाविकास आघाडी फिस्कटली असून काँग्रेसने स्वबळावर रिंगणात उडी घेतली आहे.
सर्वप्रथम सकाळी भाजपातर्फे दुसरा अर्ज जिल्हा कार्यकारिणी सदस्य विनायक उर्फ सुहास गवंडळकर यांनी थेट नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, तालूकाध्यक्ष पप्पू परब, जिल्हा निमंत्रित सदस्य साईप्रसाद नाईक, ज्येष्ठ नेते मनवेल फर्नांडिस, वृंदा गवंडळकर, प्रणव वायंगणकर, कौस्तुभ वायंगणकर, हेमंत तुळसकर, अमेय धुरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय काँग्रेसतर्फे थेट नगराध्यक्षसाठी विलास प्रभाकर गावडे यांनी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नगरसेवक पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. तालुकाध्यक्ष विधाता सावंत, शहरअध्यक्ष प्रकाश डिचोलकर, महिला शहर अध्यक्षा कृतिका कुबल, डॉ. श्रीनिवास गावडे आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी श्री देव मानसीश्वर, श्री देव रामेश्वर, श्री देवी सातेरी आदी देवतांचे दर्शन घेऊन तदनंतर अर्ज दाखल केले. निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार ओतारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत किरुळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्ज स्वीकारण्यात आले. शहर विकास आघाडीतर्फे ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांनी थेट नगराध्यक्षसाठी व डॉ. वंदन वेंगुर्लेकर यांनी नगरसेवक पदांचे उमेदवारी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रदेश सचिव एम. के. गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरसेवक पदासाठी 3 उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातर्फे मात्र यावेळी थेट व नगरसेवक पदासाठी एकही अर्ज दाखल करण्यात आला नाही. दरम्यान थेट नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे, तुषार सापळे, उमेश येरम, अजित राऊळ, अस्मिता राऊळ, शितल आंगचेकर यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उद्यापासून उमेदवारी अर्ज छाननी व उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांची प्रचाराची ररणधुमाळीस सुरुवात होणार आहे.