कोकण रेल्वे  file photo
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग : रेल्वे थांब्याच्या बाबतीत सावंतवाडीवर अन्याय; प्रवासी संघटनेची नाराजी

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी ः कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी रोड टर्मिनसवर ‘वंदे भारत’ आणि अन्य रेल्वे गाड्यांना थांबा देताना डावलण्यात आले आहे. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसवर प्रवाशांची गैरसोय करण्यासाठी सतत अन्याय केला जात आहे, अशी खंत रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहिर मठकर, भूषण बांदिवडेकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केली आहे.

कोल्हापूर- पुणे आणि पुणे-हुबळी मार्गावर नवीन ‘वंदे भारत’ सुरू झाली आहे. पुण्याहून कोल्हापूरसाठी सुरू झालेली ही गाडी मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड, सातारा येथे थांबेल. तसेच हुबळीसाठी सुरू झालेली ‘वंदे भारत’ सातारा, सांगली, मिरज, बेळगाव, धारवाड येथे थांबेल. या दोन्ही ट्रेनचे वैशिष्ट्य म्हणजे, या गाड्या सांगली जिल्ह्यातील सांगली आणि मिरज या दोन्ही स्थानकांवर थांबणार आहेत आणि या स्थानकातील अंतर अवघे 7 किलोमीटर आहे. कोल्हापूर ‘वंदे भारत’ ही कराड आणि किर्लोस्करवाडी येथे देखील थांबेल. कराड ते किर्लोस्करवाडी स्थानकादरम्यानचे अंतर हे 35 किलोमीटर आणि किर्लोस्करवाडी ते सांगली हे अंतर 32.7 किलोमीटर आहे. म्हणजेच एकूण 326 किलोमीटरच्या या पूर्ण प्रवासात या गाडीला मध्ये पाच थांबे देण्यात आले; परंतु कोकण रेल्वे मार्गावर सुरू केलेली मडगाव-मुंबई ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ कणकवली येथे थांबते. या गाडीला सावंतवाडीत थांबा मिळावा, म्हणून स्थानिकांनी आणि प्रवासी संघटनांनी आपल्या परीने प्रयत्न केले आहेत.

कणकवली ते सावंतवाडी रेल्वेस्थानक हे अंतर 49 किलोमीटर आहे आणि सावंतवाडी ते थिवी (गोवा) हे अंतर 32.5 किलोमीटर आहे. जर ‘कोल्हापूर वंदे भारत’ ही 7,32.7 आणि 35 किलोमीटर दरम्यानच्या अंतरावर थांबू शकते, तर ‘मडगाव वंदे भारत’ सावंतवाडी स्थानकावर का थांबू शकत नाही, असा सवाल कोकण रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे मठकर आणि बांदिवडेकर यांनी उपस्थित केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT