सावंतवाडी : पुढारी वृत्तसेवा : सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या तब्बल 110 विद्यार्थ्यांना गुरूवारी रात्री अन्नातून विषबाधा झाली. त्यांना अधिक उपचारासाठी सांगेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सर्वाची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. रुग्णालयात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भेट देत माहिती घेतली. तर सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी भेट दिली.
दरम्यान, मेसमध्ये रात्रीचे जेवण घेतल्यानंतर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास या विद्यार्थ्यांना उलटी व जुलाब सुरू झाल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ राऊळ यांनी सांगितले. तब्बल 43 मुला मुलींना पहाटे तीन वाजल्यापासून जुलाब व उलटी सुरू झाली. विद्यालय प्रशासनाकडून तातडीने या विद्यार्थ्यांना सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
जेवणात वापरण्यात आलेले बटाटे चांगले नसल्यामुळे ही विषबाधा झाली असावी, असा अंदाज शाळेतील शिक्षकांकडून वर्तविण्यात येत आहे. दरम्यान विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर 48 तास लक्ष ठेवून आहेत, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एवाळे यांनी सांगितले.
हेही वाचा