सावंतवाडी : सावंतवाडी
मोती तलावाचे ऐतिहासिक महत्त्व कायम ठेवून या ठिकाणी तलाव पुनरूजीवन आणि विकास प्रकल्प येत्या वर्षाभरात सुरू केला जाणार आहे. हा प्रकल्प तीन टप्प्यात होणार असून, त्यासाठी पन्नास कोटी रुपयांचा निधी राज्य तसेच केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवून मागणी केला जाणार आहे.
नगरपालिका आणि राजघराणे यांचा हा संयुक्त महत्वाकांक्षी प्रकल्प असून यात पर्यटन, तलाव विकास आणि बऱ्याच बाबींचा समावेश असल्याची माहिती सावंतवाडी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी दिली. सावंतवाडी राजवाडा येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. युवराज लखमराजे भोसले उपस्थित होते.
त्या म्हणाल्या, मोती तलाव पुनरूजीवन आणि विकास प्रकल्प हा एक महत्त्वाचा प्रकल्प असून त्याचे आर्किटेक्चर प्रसिद्ध आर्किटेक्ट रतन बाटलीबोई करणार आहेत. त्यांनीच उदयपूर शहर व मुंबई मरीन ड्राईव्ह चे सुशोभीकरण केले आहे. मोती तलाव हे शहरातील ऐतिहासिक वारसा स्थळ आहे त्यासाठी त्याला काही कामे प्रस्तावित करून मजबूती करणे, पाणी शुद्धीकरण प्रकल्प बसविणे तसेच गाळ काढणे.
पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना बसण्यासाठी मोती तलावाच्या आतून बैठक व्यवस्था केली जाणार आहे. याचे सादरीकरण पालकमंत्री नीतेश राणे यांनी आ. दीपक केसरकर यांच्या समोर केले आहे. राजघराणे आणि नगरपालिका व शासनाचा हा संयुक्त प्रकल्प आहे असे नगराध्यक्षा मोसले यांनी सांगितले. हा प्रकल्प व्यापक जनहितासाठी शासन आणि राजघराणे यांच्या एकत्रित प्रयत्नांचे प्रतीक आहे.
आज महत्त्वाची वारसा पर्यटन केंद्रे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारंपरिक शहरांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन, थर्टी स्क्वेअर आणि आरजेबी-सीपीएल यांच्या भागीदारीतून, तसेच त्यांचे पर्यावरण भागीदार, एज्युकेटेड एन्व्हायर्नमेंट (ईडन एलएलपी) सावंतवाडी : मोती तलावाचा सुधारित नवीन प्रकल्प आराखडा सादर करताना नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले, युवराज लखमराजे भोसले. यांच्या सहकार्याने व्यापक दूरदृष्टी योजना बनविण्यात आली असून सावंतवाडीची सुकन्या श्रद्धा भाट यांनी प्रकल्प सादरीकरण केले आहे.
लोक, स्थळ आणि पाणी या तीन मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित, मोती तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाची संकल्पना असून सावंतवाडीची सांस्कृतिक आणि सौंदर्यात्मक ओळख जतन करण्याबरोबरच विचारपूर्वक आधुनिक विकास घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. एकेकाळी शहरातून वाहणाऱ्या पाण्याचे नैसर्गिक संकलन केंद्र असलेल्या मोती तलावाचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून, हा प्रस्ताव तलावाच्या काठावरील भिंतींची स्वच्छता, संवर्धन आणि स्थिरीकरण करून तलावाची परिसंस्था पुनर्संचयित करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
स्थानिक गोष्टींचा गौरव करणे आणि त्याच वेळी शाश्वत व सांस्कृतिकदृष्ट्या दृढ पद्धतीने जागतिक पर्यटनाला आकर्षित करणे ही या प्रकल्पाची व्यापक संकल्पना असून तलावात फूड पार्क, नौकाविहार सुविधा, उत्सव चौक, घाट, दशावतार नाटक आणि स्थानिक कला प्रकारांसाठी रंगमंडप यांसारख्या बाबी उभारण्यात येणार आहेत. शांत तलावाकाठच्या परिसरांच्या निर्मितीद्वारे पर्यावरणीय, सांस्कृतिक आणि आर्थिक उपजीविका मजबूत करणे, हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे राजघराण्याच्या वतीने युवराज लखमराजे भोसले यांनी सांगितले.
मोती तलावाचे प्रस्तावित पुनरुज्जीवन हा सावंतवाडीसाठी एक प्रगतीशील दृष्टिकोन असून वारसा विकास, समुदाय आणि पर्यटन, तसेच पर्यावरणीय जबाबदारी आणि आर्थिक संधी यांच्यात संतुलन साधून हा प्रकल्प यशस्वी करयाचा आहे, अशी माहिती नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी दिली.
आम्ही काम करतो, त्यांना आरोप करू दे !
शहरातील कामे पावसाळा पूर्वी करण्यावर भर दिली आहे. भटके कुत्रे यावर रेबीज मिशन संस्थेशी टाय अप करून निधी आणला जाईल. त्यासाठी पालकमंत्री यांना पत्र दिले आहे, गुरांसाठी कोंडवाडा उभारण्यात येणार असून, निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे शहराचा विकास करण्यावर आमचा भर असल्याचे सौ. भोसले यांनी सांगितले. आम्ही काम करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे आरोप होताच राहतील आपण काम करूया, असा टोला नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले यांनी विरोधकांना लगावला.