कणकवली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आल्यानंतरच टोल सूरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यांनी महामार्ग अपूर्ण राहिल्याबद्दल जनतेची माफी मागितली होती मात्र त्यावेळी कोकणवासियांची माफी मागण्यापेक्षा जनतेला टोल माफी द्या, अशी मागणी आम्ही केली होती. परंतू मंत्री गडकरी सिंधुदुर्गात आले आणि टोल भेट देवून गेले, अशी टीका ठाकरे शिवसेनेचे माजी आ. वैभव नाईक यांनी केली.
येथील विजय भवन मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वैभव नाईक म्हणाले, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी मे अखेर पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण करण्याची ग्वाही दिली आणि दुसरीकडे टोलनाका सूरू करण्याची कार्यवाही सुरू झाली. त्यांच्या भेटीनंतर टोल कोणी सत्ताधाऱ्यांनी घ्यायचा याबाबतची चर्चा असेल. १७ एप्रिल रोजी ओसरगांव टोलनाका सूरू करण्याच्या अनुषंगाने निविदा मागविण्यात आल्या आहेत.
खरेतर महामार्गाचे काम अपूर्ण असल्याने अडिच वर्षापूर्वी आम्ही अखेरपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण करण्याची ग्वाही दिली असली तरी अजून एक ते दीड वर्षाचा कालावधी जाणार आहे. मागील वेळेस टोल वसूली विरोधी आंदोलनात व्यापारी संघाने आणि वेगवेगळ्या संघटनांनी सहभाग घेतला होता, त्याप्रमाणे आताही सिंधुदुर्गातील जनतेने आणि वेगवेगळ्या संघटनांनी टोल वसूली होवू नये यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन वैभव नाईक यांनी केले.
ज्यावेळी आम्ही टोल माफीची मागणी केली, त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी अशी टोलमाफी दिली जाते का? असे सवाल केले होते. तर मग १२ वर्षे महामार्ग रखडतो का? हाही प्रश्न आहे. जोपर्यंत महामार्ग पूर्ण होत नाही तोपर्यंत टोलवसूली करू नये यासाठी ठाकरे शिवसेना आंदोलन करेलच परंतू नागरीकांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे. त्यांनीही या टोल वसूलीला विरोध केला पाहिजे. एकदा हे टेंडर निश्चित झाले की टोल वसूली सूरू होईल. सत्ताधारीच या टोल मध्ये गुंतलेले असल्याने पोलिसांकरवी दडपशाही केली जाईल, त्यामुळे सिंधुदुर्गवासियांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन वैभव नाईक यांनी केले.
२७ एप्रिल रोजी या निविदा उघडून ठेकेदार एजन्सी निश्चित केली जाणार आहे. परंतु हे टेंडर तुम्ही भरू नका, टेंडर घेणाऱ्या कंपन्यांनी लक्षात ठेवावे की आमचे आंदोलन होणारच आहे असा इशारा वैभव नाईक यांनी दिला.
सर्व्हे करणारी कंपनी सत्ताधाऱ्यांशी संबंधित
टोल वसूलीच्या पार्श्वभूमीवर ओसरगाव येथे सव्हें सुरू असून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची नोंद घेतली जात आहे. याबाबत वैभव नाईक म्हणाले, सर्व्हे करणारी कंपनी सत्ताधाऱ्यांशी संबंधित आहे. गेले आठ दिवस पाहणी सुरू आहे. मंत्री गडकरी सिंधुदुर्गात आल्यापासूनच हे सुरू झाले आहे, ते कोणाला भेटले? गडकरी कोणत्या सत्ताधा-यांच्या जवळ आहेत हे जनतेला माहीत आहे, असा टोलाही वैभव नाईक यांनी लगावला.
अवैध धंदे रोखण्यात पोलिस अपयशी
सिंधुदुर्गात अवैध धंदे सूरू नाहीत असे पालकमंत्री, गृहमंत्री सांगतात, परंतू जिल्ह्या सिंधुदुर्ग नशामुक्त करण्यासाठी व्याख्याने द्यावी लागतात. सिंधुदुर्गात ड्रग्ज, चरसचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभुमीवर वेगवेगळ्या संघटनांनी एक चर्चासत्र ठेवले आहे. खरेतर हे आम्ही विरोधकांनी केले असते तर सिंधुदुर्गचे नाव बदनाम करत आहेत असे सत्ताधाऱ्यांनी म्हटले असते. अवैध धंदे रोखण्यात पोलिस खाते अपयशी ठरल्याचा आरोप श्री. ना ईक यांनी केला.