कणकवली : मंत्री नितेश राणे यांनी पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराची संधी मिळणार अशी घोषणा केली आहे. मात्र 500 कि.मी. दूर असलेल्या वाढवण बंदरात सिंधुदुर्गातील तरुणांना रोजगाराचे आमिष देण्यापेक्षा नारायण राणे यांनी बंदर विकासमंत्री असताना रेडी बंदर विकसित करून रेडी बंदराच्या माध्यमातून जिल्ह्यातील तरुणांना नोकरी देण्याच्या केलेल्या घोषणेचे काय झाले, राणे ती घोषणा कधी पूर्ण करणार हे त्यांनी आधी सांगावे. की रेडी प्रमाणेच वाढवण बंदरातील नोकर्यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना आमिष दाखवून तरुणांची फसवणूक करणार आहात? असा सवाल ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे, बंदर विकास मंत्री असताना नारायण राणे यांनी 2009 मध्ये खाजगी तत्वावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी बंदर विकसित करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी जॉन अर्नेस्ट या खाजगी कंपनीसोबत 50 वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यात आला. हजारो लोकांना या रेडी बंदराच्या माध्यमातून नोकरी देण्याचे आमिष नारायण राणेंनी त्यावेळी दिले होते. मात्र राणेंच्या भागीदाराने दरवर्षी साधारण 25 कोटी इतका नफा मिळविला आणि शासनाला करापोटी केवळ अडीच कोटी रु. जमा करून शासनाची फसवणूक केली. सामंजस्य कराराप्रमाणे भागीदाराने टप्प्याटप्प्याने रेडी बंदर विकसित करणे अपेक्षित होते.
9 जेटींसह इतरही मोठे प्रकल्प येथे राबवायचे होते. मात्र सामंजस्य कराराचेही उल्लंघन करत भागीदाराने रेडी बंदराचा कोणताच विकास केला नाही. त्यामुळे हजारो लोकांना या रेडी बंदराच्या माध्यमातून नोकरी देण्याची राणेंची घोषणा फोल ठरली. मात्र रेडी बंदराच्या माध्यमातून करोडो रुपयांचा फायदा नारायण राणे आणि भागीदाराला झाला.
आता तशाच पद्धतीने मंत्री नितेश राणे यांनी पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या माध्यमातून 5 ते 7 हजार नोकर्या उपलब्ध होणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराची संधी मिळणार अशी घोषणा केली आहे. मात्र 500 किलोमीटर दूर असलेल्या वाढवण बंदरात सिंधुदुर्गातील तरुणांना रोजगाराचे आमिष देत असाल तर आधी रेडी बंदराचे काय झाले हे राणेंनी सांगावे, असे आवासहन वैभव नाईक यांनी केले आहे.