कुडाळ: पुढारी वृत्तसेवा : उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू उद्योजक किरण सामंत हे चतुर उद्योगपती आहेत, राजकीय पदाधिकारी आहेत. पहिले ते राष्ट्रवादीत होते, नंतर त्यांना चाहूल लागली की शिवसेनेची सत्ता येणार म्हणून ते शिवसेनेत आले. आता ते शिंदे गटात आहेत, पण आता त्यांना राज्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार येणार असल्याची चाहूल लागली, त्यामुळे ते ठाकरे गटात येणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी केला.
कुडाळ येथे 'होऊ द्या चर्चा' हा कार्यक्रम झाल्यानंतर आ. नाईक यांनी कुडाळ शिवसेना शाखा येथे माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी नाईक (Vaibhav Naik) म्हणाले की, कुडाळ-मालवण मतदारसंघातील नागरिकांना राज्यातील शिंदे-फडणवीस- पवार सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर पडलेल्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी ठाकरे गटाने 'होऊ द्या चर्चा'या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सत्ताधार्यांनी चाय पे चर्चा करून लोकांना खोटी आश्वासने दिली होती. त्यात सर्वसामान्य जनता सुद्धा फसली, आम्ही ही फसलो. आज महागाई, पेट्रोल- डिझेल दरवाढ, आरोग्य, बेरोजगारी हे जनतेचे प्रश्न आहेत. त्याकडे कोण पाहणार? असा सवाल यावेळी आ. नाईक यांनी उपस्थित केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे सरकार स्थापन होण्यापूर्वी आमच्याबरोबर होते. त्यावेळी भाजप अजित पवार हे चोर आहेत, असे आरोप करीत होते. नीतिमत्ता असेल तर शिंदे गट यावेळी दसरा मेळावा घेणार नाहीत. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी पुरेसा औषध साठा नाही. येथील डॉक्टर कर्मचार्यांना दोन महिने वेतन होत नाहीत. तर गर्भवती महिलांना आवश्यक असणारी औषधेही उपलब्ध होत नाहीत, अशी भयावह स्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारने नुकताच 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम राबविला. पण यासाठी जिल्हा नियोजनमधून 1 कोटीचा निधी घेतला गेला. हाच निधी आरोग्यासाठी वापरता आला असता पण तो वापरला गेला नसल्याची खंत यावेळी आ. नाईक यांनी व्यक्त केली.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील खासदारकीची उमेदवारी ही विनायक राऊत यांनाच मिळणार आहे. दोन्ही टर्म त्यांनी चांगले काम केले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे एकमुखाने आम्ही मागणी केली असून येत्या रविवारी मातोश्रीवर बैठक होईल. या बैठकीत खा. राऊत यांच्या उमेदवारीवर शिक्कमोर्तब होईल, असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.
हेही वाचा