सावंतवाडी : कोकणातील सर्वात मोठा सण गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर, महावितरणच्या निष्क्रिय आणि असंवेदनशील कारभाराविरोधात सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना आक्रमक झाली आहे. यापूर्वी वेळोवेळी निवेदने देऊन, प्रत्यक्ष भेटी घेऊन आणि लाक्षणिक उपोषण करूनही प्रशासनाने आणि महावितरणने ग्राहकांच्या समस्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे अखेर वीज ग्राहक संघटनेने 15 ऑगस्ट रोजी, स्वातंत्र्यदिनी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो वीज ग्राहकांच्या पाठिंब्यावर लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्धार केला आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळेच उपोषणाची वेळ आली असून, याला पूर्णपणे जिल्हा प्रशासन आणि महावितरण जबाबदार असेल, असा गंभीर इशाराही संघटनेने दिला आहे.
या पार्श्वभूमीवर रविवारी सावंतवाडी येथे जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.यावेळी 15 ऑगस्ट रोजी होणार्या उपोषणाचा निर्णय घेण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना ही गेल्या तीन वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आली. जिल्ह्यातील एकूण 3 लाख 59 हजार 223 वीज ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी ही संघटना सातत्याने प्रयत्नशील आहे.
गेल्या तीन वर्षांपासून वारंवार निवेदने देऊनही आणि 26 जानेवारी 2024 रोजी अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करूनही वीज ग्राहकांच्या समस्यांमध्ये फरक पडलेला नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहा. अभियंता यांच्या चुकीच्या कारभारामुळे वीज ग्राहकांना प्रचंड त्रास होत आहे. वीज पुरवठ्यातील अनियमितता, वारंवार होणारे बिघाड, वाढीव वीज बिले, स्मार्ट मीटर बसवण्यासारख्या विवादास्पद निर्णयामुळे ग्राहक त्रस्त आहेत. यापूर्वी हजारो ग्राहकांनी वैयक्तिक तक्रारी नोंदवल्या असूनही, महावितरण कोणत्याही ग्राहकाचे समाधान करू शकलेले नाही.
जिल्हाध्यक्ष संजय लाड, जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर,समीर शिंदे, बाळासाहेब बोर्डेकर, जिल्हा सचिव दीपक पटेकर, मनोज घाटकर, म्हापसेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत उपोषणाचे नियोजन करण्यात आले आणि सर्व वीज ग्राहक, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, सर्वपक्षीय नेते आणि नागरिकांना मोठ्या संख्येने उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
आंदोलनात केवळ वीज पुरवठ्याच्या समस्याच नव्हे, तर स्मार्ट मीटरचा मुद्दाही केंद्रस्थानी आहे. जिल्हा सचिव दीपक पटेकर यांनी सांगितले की, स्मार्ट मीटरच्या विरोधात संघटनेचा लढा सुरूच राहणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे 40,000 स्मार्ट मीटर लावण्यात आले आहेत. यामध्ये कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग तालुक्यात 15,000 तर कणकवली विभागात 25,000 स्मार्ट मीटरचा समावेश आहे. सावंतवाडी शहरातच एक हजार स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत.स्मार्ट मीटरमुळे होणार्या संभाव्य धोक्यांबाबत पटेकर यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी ग्राहकांना आवाहन केले की, त्यांनी आताच सावध व्हावे.