सिंधुदुर्गनगरी : पुढारी वृत्तसेवा
उत्पादित काजू बी खरेदी व साठवण करण्यासाठी विकास सहकारी संस्था, खरेदी विक्री संघ यांच्या माध्यमातून गोदाम उभारणी करणे, कारखानदारांना प्रक्रिया करण्यासाठी काजू-बीचा पुरवठा करणे, कोकणातील काजूला जीआय मानांकन मिळण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांची नोंदणी करणे, बैंड विकसित करणे, काजू-बोंडूवर प्रक्रिया उद्योगासाठी चालना देणे यावर चर्चा करून शासनाकडे शिफारस करण्याचे महाराष्ट्र राज्य काजू मंडळ गठित विशेष समिती सभा सिंधुदुर्गनगरी येथे घेण्यात आली होती.
कोकणातील काजू प्रक्रिया उद्योगाच्या अडचणी, काजू उद्योगाला लागणारे खेळते भांडवल, दर्जेदार कच्चा मालाचा अनियमित पुरवठा आदी समस्यांबाबत काजू मंडळाने एक सर्वसमावेशक योजना तयार करण्याकरिता महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे संचालक मनीष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती गठित करण्यात आली आहे.
या समितीची पहिली सभा शुक्रवार ८ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग बँकेच्या सभागृहामध्ये पार पडली. समिती सचिव काजू बोर्ड तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविक केले. पुणे येथील महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, व्यवस्थापक विनायक कोकरे, समिती सदस्य डॉ. परशुराम पाटील, श्री. यादव, रुपेश बेलोसे, तसेच मुख्यालय पुणेचे सहाय्यक सव्यवस्थापक महेंद्र पवार, बाजार समिती सभापती तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सदस्य संचालक तुळशीदास रावराणे, सिंधुदुर्गचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, सहकारी संस्थेचे प्र. जिल्हा उपनिबंधक सुनील मरबळ, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले, फळ संशोधन केंद्र शास्त्रज्ञ श्री. क्षीरसागर, तसेच शेतकरी व प्रक्रियादार प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे स्वागत अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते करण्यात आले.
उपस्थित शेतकरी व प्रक्रियादार यांच्याकडून त्यांना उद्भविणाऱ्या प्रोसेसिंग, मार्केटिंग, निर्यात, आर्थिक बाबी अशा समस्याबाबत जाणून घेण्यात आले आणि त्यावर कोणत्या उपाययोजना करण्यात येऊ शकतात, याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर काजू उत्पादन वाढवणे, उत्पादित काजू बी खरेदी व साठवण करण्यासाठी विकास सहकारी संस्था, खरेदी विक्री संघ यांच्या माध्यमातून गोदाम उभारणी करणे, कारखानदारांना प्रक्रिया करण्यासाठी काजू बीचा पुरवठा करणे, कोकणातील काजूला जीआय मानांकन दृष्टीने शेतकऱ्यांची नोंदणी करणे, बॅड विकसित करणे, काजू बोडूवर प्रक्रिया उद्योगासाठी चालना देणे, यासारख्या अनेक विषयांवर या सभेमध्ये चर्चा झाली असून याबाबतच्या शिफारशी शासनाकडे सादर करण्याचे निश्चित करण्यात आले.
कार्यकारी संचालक संजय कदम यांनी काजू मंडळाची उद्दिष्टे तसेच सभेतील विषयांबाबत आपले मत मांडले व शेतकरी व प्रक्रियादार यांनी मांडलेल्या अडचणी समस्या यावर आपले मत व्यक्त केले. या सभेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी सर्व शेतकरी व प्रक्रियादार यांच्या अडचणी त्यावर करावयाचे उपाय तसेच शेतकरी व प्रक्रियादार यांनी सुचविलेल्या काही महत्त्वपूर्ण सूचना याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. समिती सचिव मिलिंद जोशी यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी शेतकरी प्रक्रियादार यांचे सभेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त केले व समेची सांगता झाली.