सावंतवाडी : पुढारी वृत्तसेवा
सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागातून वीज पुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात वीज वितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये धडक देत आहेत. शुवक्रवारी माडखोल- बावळट ग्रामस्थांनी वीज अधिकार्यांना धारेवर धरत तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन केले. सावंतवाडी शहरातील वीजपुरवठा सुरळीत आहे तर मग आम्ही अंधारात का? आम्ही अंधारात तर सगळेच अंधारात ठेवा, त्यांचाही वीजपुरवठा बंद करा, अशी मागणी करत वीज अधिकार्यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले. अखेरीस पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
सातोळी-बावळट सरपंच सोनाली परब, माडखोल माजी सरपंच बाबू शिरसाट, रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, दत्ताराम कोळमेकर, प्रथमेश सावंत, राहुल परब, परेश परब, रोहन बिरोडकर, देविदास परब, पांडुरंग बुरान, योगेश बुरान, रोहित सावंत, अक्षय परब, अक्षय दळवी, सुरेश कदम, उत्तम ठाकूर, योगिता बुरान, किरण चिले, आनंद परब, अरुण पाटील, भालचंद्र परब आदी ग्रामस्थ उपस्थित होते. माडखोल- बावळट परिसरातील ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळी सावंतवाडी वीज कार्यालयामध्ये धडक दिली आणि आमची लाईट सुरू करा, अन्यथा संपूर्ण सावंतवाडी तालुक्याचा वीज पुरवठा बंद करा, अशी मागणी केली. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे गावा-गावातील वीज पुरवठा तात्काळ सुरू करा, अन्यथा जोपर्यंत पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत शहरासह तालुक्यातील पुरवठा बंद करा, अशी मागणी करत माडखोल, सातोळी-बावळाट ग्रामस्थांनी अधिकार्यांना धारेवर धरले.गावातील वायरमन फोन उचलत नाही. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली.
सुरळीत वीज पुरवठ्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. सगळीकडेच वादळ झाल्यामुळे झाडे उन्मळून पडली आहेत. दुसरीकडे कर्मचार्यांची कुमक कमी असल्यामुळे अडचणी येत आहेत, अशी माहिती वीज अधिकारी कुमार चव्हाण व दीपक खोरागडे यांनी दिली. यावेळी ग्रामस्थांनी जोरदार नाराजी व्यक्त करत तब्बल 2 तास वीज कार्यालयाला घेराव घातला. वारंवार अधिकार्यांकडून आश्वासने दिली जात आहेत. मात्र, तालुक्यातील काही भाग 15 हून अधिक दिवस काळोखात आहेत. त्यामुळे आता करायचे काय? असा सवाल त्यांनी केला. पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली, जोपर्यंत आम्हांला वीज पुरवठा सुरळीत करून मिळत नाही तोपर्यंत आपण माघार घेणार नाही, अशी त्यांनी मागणी लावून धरली.