कुडाळ : कुडाळ पंचायत समितीची मासिक सभा सोमवारी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे सभागृहात सभापती मिलिंद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत वन्य प्राण्यांचा उच्छाद, महावितरणची अजब बिले, प्रलंबित घरकुल प्रस्ताव आणि खराब रस्त्यांच्या प्रश्नावरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. वन्य प्राण्यांच्या नुकसानीवरून उपसभापती सीताराम तेलौ यांनी आमची जनावरे वनात गेली तर गुन्हे दाखल होतात, मग ही राष्ट्रीय संपत्ती आमच्या शेतात घुसल्यावर आम्ही काय करायचे? असा संतप्त सवाल वनविभागाला विचारला.
व्यासपीठावर उपसभापती सीताराम तेली, गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, पंचायत समिती सदस्य व विविध खात्यांचे प्रमुख उपस्थित होते.
वनविभागाच्या कार्यपद्धतीवर संशय
तेंडोली परिसरात गवे आणि माकडांच्या त्रासामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, वनविभागाने आतापर्यंत ३,५०० माकडांना पकडून अभयारण्यात सोडल्याची माहिती दिली. मात्र, तेंडोली परिसरात वारंवार जेरबंद केलेले बिबटे नेमके कुठे सोडले जातात? असा सवाल सदस्य मंगेश प्रभू यांनी केला. वनविभाग हे बिबटे दाजीपूरला न सोडता जवळच सोडत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.
महावितरणचा 'शॉक': मीटर नाही तरीही २ हजारांचे बिल
कुडाळ तालुक्यातील जांभवडे येथील राजेंद्र कृष्णा कदम यांच्या घरी महावितरणने अद्याप वीज मीटर बसवलेला नाही, तरीही त्यांना २ हजार रुपयांचे बिल आलेच कसे? असा सवाल सदस्य बाळकृष्ण मडव यांनी केला. महावितरणच्या या अनागोंदी कारभारावर सभागृहात तीर्व चर्चा झाली.
रस्ते आणि शाळांच्या दुरुस्तीचा प्रश्न
माणगाव दत्त मंदिर ते चर्च रस्त्याशेजारी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. वारंवार तक्रार करूनही बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याकडे योगेश धुरी यांनी लक्ष वेधले. तसेच, माणगाव शाळा क्र.२ च्या मोडकळीस आलेल्या इमारतीबाबत तीन वर्षांपासून प्रस्ताव देऊनही निधी मिळत नसल्याने, पावसाळ्यात मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास जबाबदारी कोण घेणार? असा जाब धुरी यांनी विचारला. सभापती मिलिंद नाईक यांनी यावर संबंधित यंत्रणेला तातडीने भेटी देण्याचे आदेश दिले.
घरकुल आणि कृषी योजना
वालावल-हुमरमळा येथील २७ लाभार्थी घरकुलापासून वंचित असल्याचा प्रश्न अर्चना बंगे यांनी मांडला, तर हिर्लोक येथील घरदुरुस्तीचे प्रस्ताव पंचायत समितीकडे का आले नाहीत? अशी विचारणा अश्विनी सावंत यांनी केली. विस्तार अधिकारी यादी मंजूर होणार असल्याचे स्पष्ट केले. पीएम किसान योजनेसाठी २०१०-११ पूर्वीचे आधार कार्ड अनिवार्य असल्याच्या जाचक अटीमुळे शेतकरी अडचणीत असल्याचे बाळकृष्ण यांनी सांगितले. यावर श्री. चौगुले यांनी जुन्या आधार कार्डाची अट शिथिल करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले.
कुंदे-आंब्रड गावात कुडाळ डेपोची बस येत नसल्याने विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय होत असल्याबाबत नितीन म्हाडेश्वर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. ओरोस येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या कॉम्प्लेक्सचे सांडपाणी थेट नाल्यात सोडले जात असल्याकडे अमित भोगले यांनी लक्ष वेधले. गोपीनाथ मुंडे योजनेत अपघातानंतर ३ दिवसात अर्ज करणे बंधनकारक आहे. सद्यस्थितीत कुडाळ तालुक्यात१२ प्रलंबित प्रस्ताव मंजूर असल्याचे कृषी अधिकारी चौगुले यांनी सांगितले. सभेला काही खातेप्रमुख अनुपस्थित राहिल्याने सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सभापती मिलिंद नाईक यांनी सर्व प्रलंबित प्रश्नांवर त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
तो रोलर गेला कुठे? प्रशासनाची भंबेरी
सभे दरम्यान योगेश धुरी यांनी तालुक्यातील बांधकाम विभागातील एका रोलरचा विषय ऐरणीवर आणला. तालुक्यात एक रोलर भंगारात विकला गेल्याची चर्चा सुरू आहे. तो रोलर नेमका कोणात्या विभागाचा होता? तो पंचायत समितीचा तर नव्हता ना? असा प्रश्न धुरी यांनी विचारताच उपस्थित अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. यावर उत्तर देताना संबंधित अधिकान्याने चार महिन्यांपूर्वी तो रोलर तिथे उभा होता असे सांगत, अधिक माहिती घेऊन सांगतो, असे सांगितले. या संदिग्ध उत्तरामुळे रोलरच्या विक्रीबाबत संशयाचे धुके अधिक दाट झाले आहे.