Konkan Railway  Pudhari Photo
सिंधुदुर्ग

Sindhudurg |आमच्याच जमिनीवरून धावणाऱ्या रेल्वेत आम्ही भिकारी आहोत काय?

कोकणवासीयांचा संतप्त सवाल; न्याय हक्कांसाठी 'आरपार'च्या लढाईचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : स्वतःच्या घामाच्या पैशाने हक्काचे 'कन्फर्म तिकीट' काढलेले असतानाही, परराज्यातून खच्चून भरून आलेल्या गर्दीमुळे कोकणी प्रवाशांना गाडीत शिरता न आल्याने प्लॅटफॉर्मवरच राहावे लागल्याची संतापजनक घटना नुकतीच रत्नागिरी स्थानकावर घडली. या घटनेचे पडसाद संपूर्ण कोकणात उमटत असून, 'आमच्याच जमिनीवरून धावणाऱ्या रेल्वेत आम्ही भिकारी आहोत काय? असा संतप्त सवाल आता कोकणवासी विचारू लागले आहेत.

कोकण रेल्वे मार्गावरून दररोज दक्षिणेकडून आणि गोव्यातून उत्तर भारताकडे जाणाऱ्या शेकडो गाड्या धावतात. मात्र, या गाड्या आधीच परप्रांतीय प्रवाशांनीतुडुंब भरलेल्या असतात की, कोकणातील स्थानकांवरून चढणाऱ्या प्रवाशांना आरक्षित जागा असूनही डब्यात पाऊल ठेवायला जागा मिळत नाही. रेल्वे प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनामुळे मराठी माणसाची होणारी ही परवड आता सहनशक्तीच्या पलीकडे गेल्याची भावना व्यक्त होत आहे

सावंतवाडी टर्मिनस' हाच एकमेव पर्याय या त्रासातून सुटका हवी असेल, तर गोव्यावर अवलंबून न राहता सावंतवाडी रेल्वे टर्मिनस तातडीने पूर्ण क्षमतेने सुरू होणे हाच तांत्रिकदृष्ट्या सक्षम उपाय असल्याचे रेल्वे अभ्यासकांचे म्हणणे आहे. सावंतवाडीतून गाड्या सुटल्यास त्या केवळ कोकण आणि महाराष्ट्रासाठी असतील. टर्मिनसमुळे गाड्यांची देखभाल तिथेच होईल, पर्यायाने गाड्या गोव्याला नेण्याची गरज उरणार नाही. पूर्ण क्षमतेच्या टर्मिनसमुळे स्थानिकांच्या रोजगारासह रेल्वे सुविधांचा दर्जा सुधारेल.

आता आरपारची लढाई : २६ एप्रिलला मुंबईत 'महासंग्राम'

रेल्वे प्रशासनाच्या या दादागिरीविरोधात आणि कोकणी माणसाच्या हक्कासाठी आता निर्णायक लढा पुकारण्यात आला आहे. येत्या २६ एप्रिल रोजी स. १० वा. पासून दादर (मुंबई) येथे 'महाराष्ट्र रेल्वे परिषद' आयोजित करण्यात आली आहे. "ज्या रेल्वेसाठी आमच्या पूर्वजांनी जमिनी दिल्या, तिथेच आम्हाला गृहीत धरले जात असेल, तर आता विनंत्या नाही तर हक्क हिसकावून घेण्याची वेळ आली आहे," असा इशारा कोकण रेल्वे प्रवाशांकडून देण्यात येत आहे. ही परिषद म्हणजे रेल्वे प्रशासनाला झोपेतून जागे करण्यासाठी पुकारलेली 'आरपारची लढाई' मानली जात आहे. हा अन्याय रोखण्यासाठी आणि आपल्या हक्काच्या गाड्या सावंतवाडीतून सुरू करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT