वैभववाडी : पुढारी वृत्तसेवा
वैभववाडी तालुक्यातील रस्त्यांच्या कडेला सामाजिक वनीकरण विभागामार्फत सुमारे २० वर्षांपूर्वी लावलेल्या झाडांची सरसकट तोड केली जात असल्याचा मुद्दा सभेत उपस्थित झाला. सा. बां. विभागाने केवळ धोकादायक झाडांचीच तोड करावी. मात्र, काही जण या कारवाईचा गैरफायदा घेत झाडांची राजरोस कत्तल करीत आहेत. या झाडांचा नेमका फायदा कोण घेत आहे? तसेच या झाडांची मालकी नेमकी कोणाची? असा सवाल मंगेश लोके व देवानंद पालांडे यांनी केला.
वैभववाडी पंचायत समितीची मासिक सभा सभापती सिद्धेश रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपसभापती साची कोलते, सदस्य देवानंद पालांडे, मंगेश लोके, सुवर्ण संसारे, साधना नकाशे, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ आदी उपस्थित होते.
विजयदुर्ग-पाचल बससेवा बंद असल्यामुळे भुईबावडा-जांभवडे परिसरातील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवास कसा करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याची तातडीने दखल घेऊन बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी सभेत करण्यात आली.
तालुक्यात वन्यप्राण्यांकडून पाळीव प्राण्यांवर हल्ले करून त्यांना ठार मारण्याचे प्रकार वाढत आहेत. अशा घटनांमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई मिळण्यासाठी वन विभागाने तातडीने प्रस्ताव पाठवावेत, अशी सूचना सभापती सिद्धेश रावराणे यांनी वन अधिकाऱ्यांना केली.
स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी शासनाचा त्यासंदर्भातील नेमका शासन निर्णय (जीआर) काय आहे, याची माहिती ग्राहकांना देण्यात यावी. स्मार्ट मीटरमुळे विजेची बिले वाढत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून येत आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या शंकांचे निरसन करूनच स्मार्ट मीटर बसवण्यात यावेत, अशी मागणी उपसभापती साची कोलते यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी या कोकण रेल्वे मार्गावर नवीन रेल्वेसेवा सुरू करण्यास परवानगी मिळाल्याबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, खा. नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांचे पंचायत समिती सभेत अभिनंदन करण्यात आले. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल सभागृहात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
वैभववाडी बसस्थानकातून सुटणारी विजयदुर्ग-पाचल बससेवा बंद असल्याने भुईबावडा-जांभवडे परिसरातील विद्यार्थी व नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांना प्रवासासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून ही बससेवा तातडीने पूर्ववत सुरू करावी. अन्यथा आंदोलनाचा इशारा पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे यांनी दिला.