देवगड : पुढारी वृत्तसेवा
केंद्रीय मीठ आणि सागरी रसायन संशोधन संस्था यांच्या सहकार्याने केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत देवगड तालुक्यातील तांबळडेग परिसरातील समुद्रामध्ये मच्छीमार व ग्रामस्थांनी समुद्र शेवाळ शेतीचा यशस्वी प्रयोग राबवून समुद्रातील शेतीचा एक आदर्श निर्माण केला आहे.
तांबळडेग समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे ८ ते १० वाव अंतरावर, अंदाजे दीड हेक्टर समुद्रात ही शेवाळ शेती करण्यात आली आहे. या उपक्रमात स्थानिक शेतकरी शेखर राणे, यश मालडकर, मंदार सनये आणि मारुती धुवाळी यांनी पुढाकार घेतला असून त्यांना प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेतून आर्थिक सहाय केंद्रीय मीठ आणि सागरी रसायन संशोधन संस्थेमार्फत देण्यात आले आहे.
या शेतीच्या यशस्वीतेसाठी केंद्रीय मीठ आणि सागरी रसायन संशोधन संस्थेचे डॉ. अरुण घोष, डॉ. मोनिका कवळे आणि अनिल पावशे यांनी शेतकऱ्यांना विशेष मार्गदर्शन व सहकार्य केले. तसेच ही शेती यशस्वी होण्यासाठी शेतकरी शेखर राणे यांनी विशेष परिश्रम घेतले असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
समुद्र शेवाळाचा उपयोग सेंद्रिय खत, औषधनिर्मिती तसेच खाद्यपदार्थ घट्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. विशेषतः या सेंद्रिय खतामुळे पिकांची पोषण शोषण क्षमता वाढते, अजीविक ताण सहन करण्याची ताकद वाढते तसेच उत्पादन व गुणवत्ता सुधारते. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी हा पर्याय अत्यंत फायदेशीर ठरत आहे.
उत्पादित शेवाळाची खरेदी 'क्लायमा क्यू' या कंपनीकडून हमीभावाने करण्यात येत असून त्यामुळे या शेतीला ठोस बाजारपेठही उपलब्ध झाली आहे. कंपनीकडून शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन, प्रशिक्षण, शेवाळाचे बीज उपलब्ध करून देणे तसेच उत्पादित मालाची खरेदी अशी सर्वसमावेशक मदत दिली जाते. या उपक्रमामुळे देवगड तालुक्यातील मच्छीमार व शेतकऱ्यांसाठी समुद्र शेवाळ शेती हा उत्पन्नाचा नवा आणि शाश्वत पर्याय ठरत असून भविष्यात अधिकाधिक शेतकरी या शेतीकडे वळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.