रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तीन महिने उलटूनही रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील काही शाळांना उर्दू आणि मराठी माध्यमाची आवश्यक पाठ्यपुस्तके अद्याप मिळालेली नाहीत. युडायसच्या नोंदीनुसार पुस्तकांचे वाटप करण्यात आले असून, ज्या शाळांना ज्यादा पुस्तकांची आवश्यकता आहे, त्यांच्याकडून मागणी मागवण्यात आली असून हजारो पुस्तकांची आवश्यकता आहे.
त्यामुळे ज्यादा पुस्तकांसाठी शिक्षण विभागाच्या वतीने बालभारतीकडे मागणी केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना पुस्तकाविना अभ्यास करावा लागत आहे.
राज्य शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक वितरण योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके पुरविली जातात. यंदा इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आल्याने नव्या पुस्तकांची आवश्यकता वाढली आहे.
ही पुस्तके मे महिन्यातच उपलब्ध होणे अपेक्षित होते मात्र शाळा सुरू होऊन तीन महिने होत असले तरी मोठ्या प्रमाणात पुस्तकांचा तुटवडा कायम आहे. एकीकडे शिक्षण विभाग म्हणते, युडायसप्रमाणे जिल्ह्यातील जि. प. शाळांना १०० टक्के पुस्तकांचे वाटप झाले आहे. दुसरीकडे रत्नागिरीसह लांजा, राजापूर, संगमेश्वर, दापोलीसह इतर तालुक्यात पुस्तके मिळाली नसल्याचे सांगण्यात आले.
सहावीच्या मराठी माध्यमातील बालभारती, सेमी इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण या विषयांची पुस्तके अपुऱ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहेत. उर्दू माध्यमातील तिसरी, चौथी आणि सहावीच्या अनेक विषयांची स्थितीही अशीच आहे. त्यामुळे शिक्षकांना पाठ्यपुस्तकाविना अध्यापन करावे लागत असून विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जास्तीच्या पुस्तकांसाठी तालुक्यातून यादी मागवण्यात आली असून, हजारो पुस्तकांची मागणी आलेली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या वतीने बालभारतीकडे पाठ्यपुस्तकांसाठी मागणी केली असून, लवकरच पुस्तके येतील, अशी माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली.
युडायस प्रणालीमध्ये नोंदवलेल्या विद्यार्थी संख्येच्या आधारे सुरुवातीला पुस्तकांचे वितरण करण्यात आले. मात्र, काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढली आहे. काही विद्यार्थी यूपी, बिहार तसेच नेपाळी असल्याने आधाराची समस्या येत आहे. तसेच माध्यमनिहाय अतिरिक्त पुस्तकांची गरज निर्माण झाल्याने पुस्तकांचा तुटवडा जाणवत आहे. शिक्षण विभागाच्या वतीने अतिरिक्त पुस्तकांची यादी तयार करून बालभारतीकडे पाठवली असल्याचे सांगण्यात आले.