खेड शहर : मुंबईहून खेड तालुक्यातील शेल्डी गावी आलेल्या तरूणाचा सोमवारी (दि.१५) धरणात बुडून मृत्यू झाला. गावी आल्यानंतर आपल्या मित्रांसोबत हा तरूण पोहायला गेला होता. यादरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने त्याच्या तो पाण्यातून वाहून गेला. त्यानंतर काही अंतरावर त्याचा मृतदेह सापडला. जयेश रामचंद्र आंब्रे (खालचीवाडी) असे या मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, जयेश आंब्रे हा शनिवारी सकाळी मुंबईतील दिवा येथून आपल्या दोन मित्रांसह खेडमध्ये त्याच्या गावी आला होता . त्यानंतर तो आपल्या मित्राबरोबर सोमवारी (दि.१५) शेल्डी येथील धरणावर पोहायला गेला. शनिवार - रविवार या परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने धरणाला पाणी वाढले होते. या धरणात तो मित्रांसोबत उतरला. त्याचे दोन मित्र हळूहळू पाण्याचा अंदाज घेत उतरत होते. मात्र पोहण्याच्या मोह न आवरल्याने जयेश पाण्यात उतरुन धरणात गेला. पाण्याचा अंदाज न आल्याने जयेश पाण्यातून वाहून गेला. जयेश वाहून गेल्याचे निदर्शनास येताच मित्रांनी आरडाओरडा केला. त्यानंतर मित्रांनी गावकऱ्यांच्या मदतीने त्याचा शोध घेतला. अखेर त्याचा मृतदेह एका झाडीत अडकलेल्या स्थितीत सोमवारी दुपारनंतर मिळाला. मुंबईतून आपल्या गावी आलेल्या सुट्टी घालवण्यासाठी आलेल्या जयेशच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. जयेश आंब्रेचं तीन ते चार वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. तो मुंबईत खाजगी नोकरी करत होता. पावसाळ्याच्या दिवसात जयेश शनिवारी सुट्टी असल्याने तो गावी आला. यादरम्यान ही दुर्घटना घडली.