रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात सोमवारी हवामानात लक्षणीय बदल जाणवत असून, उष्णतेच्या तीव्रतेत काहीशी घट झाली आहे. दिवसभरात कमाल तापमान सुमारे ३२ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते.
मात्र, सोमवारी सकाळी ढगाळ वातावरण, दुपारी कडक ऊन आणि सायंकाळी वादळी वाऱ्यांसह बदलते हवामान अनुभवास आले. हवामान विभागाने कोकणासह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
सोलापूर, कोल्हापूर आदी जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. त्यामुळे त्या भागातील नागरिकांना उष्णतेचा मोठा फटका बसत आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात सायंकाळच्या वादळी वाऱ्यांमुळे आणि ढगाळ वातावरणामुळे उष्णतेची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली आहे.
दिवसाच्या वेळी उन्हाचा तडाखा जाणवत असला, तरी सायंकाळी वातावरणात गारवा निर्माण होत आहे. हवामानातील या बदलामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळत असला, तरी पुढील काही दिवस वातावरणात पुन्हा बदल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.