अग्निपंख ठरली अविस्मरणीय नाट्यकृती 
रत्नागिरी

Ratnagiri News : अग्निपंख ठरली अविस्मरणीय नाट्यकृती

सक्षम स्त्रीच्या आत्मबलाचे आणि समाजातील बदलांचे वास्तव दाखविणारे अग्निपंख

पुढारी वृत्तसेवा

दीपक कुवळेकर

रत्नागिरी : अग्निपंख हे नाटक केवळ मनोरंजक नसून, ते एका महत्त्वपूर्ण ऐतिहासिक कालखंडातील समाज आणि कुटुंबाच्या संघर्षाचे चिंतन आहे. या नाटकाद्वारे एका सक्षम स्त्रीच्या आत्मबलाचे आणि समाजातील बदलांचे वास्तव चित्रण केले आहे.

राज्य नाट्यस्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर शुक्रवारी लेखक प्र. ल. मयेकर लिखित आणि दिग्दर्शित ओंकार पाटील यांचे अग्निपंख यांचे नाटक सादर झाले. स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकीय आणि सामाजिक उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर, विशेषतः 1948 च्या तणावपूर्ण काळात कोकण प्रदेशातील एका जमीनदार कुटुंबाच्या संघर्षाचे तीव्र आणि हृदयस्पर्शी चित्रण करते. दुर्गा (बाईसाहेब): एक कणखर मातृसत्ताक या नाटकाच्या केंद्रस्थानी आहे दुर्गा (बाईसाहेब), एक दृढनिश्चयी आणि समर्थ मातृसत्ताक प्रमुख स्त्री. जमीनदारी आणि घर सांभाळण्याची दुहेरी जबाबदारी ती मोठ्या लीलया पेलते. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर देशभरात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे तिच्या आयुष्यात हलकल्लोळ माजतो. बदलत्या काळाशी दोन हात करताना आणि घराण्याचा वारसा जपत असताना तिच्या जीवनातील संघर्ष या नाटकात प्रभावीपणे उलगडला आहे.

अग्निपंख हे केवळ कौटुंबिक नाटक नसून, ते स्वातंत्र्योत्तर कोकणातील समाजव्यवस्था, गरीब-सावकार भेद, जातीयता आणि समाजातील तणाव यांचे तीव्र आणि जिवंत प्रतिबिंब दाखवते. स्वातंत्र्योत्तर काळात कुटुंब व्यवस्था एकटीने सांभाळणाऱ्या सक्षम स्त्रीवर येणाऱ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, आणि पत्नी-आई-सून म्हणून तिची भूमिका हरवत जाण्याची वेदना हे सर्व नाटक मांडते. विशेषतः, 1948 मध्ये महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर देशभरात निर्माण झालेली परिस्थिती आणि त्याचा ब्राह्मण समाजावर झालेला परिणाम या ऐतिहासिक संदर्भावरही हे नाटक अत्यंत संवेदनशील भाष्य करते. नाटकातील सर्व पात्रांनी अत्यंत कसदार अभिनय केला असून, त्यांनी आपल्या भूमिकांना पूर्ण न्याय दिला आहे. प्र. ल. मयेकर यांचे लेखन आणि दिग्दर्शक ओंकार पाटील यांच्यामुळे प्रेक्षकांना त्या काळात घेऊन जाते, ज्यामुळे अग्निपंख एक अविस्मरणीय नाट्य अनुभव ठरते.

या नाटकात बाईसाहेब यांची भूमिका ऋृचा भूते, रावसाहेब - मीनार पाटील, इंदू -चैत्राली लिमये, राजशेखर -सुशांत केतकर, सुनिता -साक्षी बने, गोखले ड्ढ संतोष गाडे, रघू -सुशील जाधव, यशवंत - कौशल्य मोहिते यांनी अभिनय सादर केला तर नेपथ्य प्रविण धुमक, पार्श्वसंगीत ओंकार बंडबे, अमेय किल्लेकर, निखिल भूते, प्रकाश योजना -उदयराज तांगडी, वेशभूषा -चैताली पाटील, आर्या जोगळेकर यांनी पाहिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT