रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यात संर्पदंशोच प्रमाण वाढले असून पावसाळ्यात सर्पदंशाचे प्रमाण सर्वाधिक असते. मात्र यंदा थंडी, उन्हाळ्यातही दंशाच्या घटना घडल्या आहेत. जानेवारी ते एप्रिल यादरम्यान तब्बल ६०३ जणांना सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर चारशेहून अधिकजणांना विचूदंश झाला आहे. याचबरोबर माकड, मांजर, कुत्रा यासह इतर प्राण्यांनी हजारो जणांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत.
रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात तापमान वाढले आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी थंड वातावरण आहे. त्याठिकाणी साप येत असतात. पावसाळ्यात तर मोठ्याप्रमाणात साप, विचू मानवी वस्तीकडे वळतात. शेतकरी शेतात कामे करताना, घरात, परिसरात सर्पदंशाचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ६०३ व्यक्तींना सर्पदंश झाला आहे.
मागील वेळेस जानेवारी ते जून यादरम्यान ५७५ व्यक्तींना सर्पदंश झाला होता. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तसेच उन्हाळ्यात, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणात येत असतात. काही ठिकणी माकडे पर्यटकांवर हल्ला करत असतात, तर काहींना गंभीर इजा करतात. जिल्ह्यातही माकडांनी हल्ला करण्याचे प्रमाण वाढत आहे.
उन्हाळा व पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात साप, विंचू, कुत्रा चावण्याच्या घटना वाढतात. अशा रुग्णांवर जिल्हा शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे योग्य ते उपचार करून त्यांना वाचविण्यात यश आले आहे.
तालुकास्तरावर तत्काळ उपचाराचा अभाव
संर्पदंश झालेल्या वृद्ध महिलेवर देवरूख ग्रामीण रुग्णालयातून तत्काळ उपचार न झाल्यामुळे वृद्ध महिलेचा मृत्यू काहीच दिवसापूर्वी झाला आहे. डॉक्टरच उपलब्ध नसल्यामुळे या महिलेवर उपचार न झाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला होता. त्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा रूग्णालयाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रिक्त जागा असेल तर ती जागा भरावी, असूनही वेळेत न आल्यास त्या डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. विविध तालुक्यात अशीच परिस्थिती आहे.