Ratnagiri News poshan ahar meal
रत्नागिरी : जिल्ह्यासह राज्यातील शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेचे (शालेय पोषण आहार) सामाजिक लेखा परीक्षण करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पाच टक्के शाळांची यासाठी निवड करण्यात आली असून रत्नागिरी जिल्ह्यातील १३९ शाळांचा समावेश आहे.
शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या निर्णयानुसार केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून चालविण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहार योजनेंतर्गत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये, यासाठी विद्याथ्यर्थ्यांना दिला जाणारा आहार, त्याची चव, स्वच्छता, साहित्याचा पुरवठा याची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील २ हजार ९८७ शाळांमधील १ लाख ४ हजार ६२८ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्यात येत आहे. तसेच खिचडी, डाळ, भात, आमटी भात याप्रकारे पोषण आहार शिजवून दिला जातो. विद्यार्थ्यांना दिला जाणारा आहार पोषक आहे का, जागा, भांडी स्वच्छ आहेत का, धान्याचा साठा याबाबत तपासणी केली जाणार आहे. तसेच पटसंख्येनुसार खरोखरच सर्व विद्यार्थ्यांना आहार दिला जातो का त्यासाठी लागणाऱ्या खर्चाची नोंद व तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता शाळांची जबाबदारी मोठ्याप्रमाणात वाढली आहे.
१३९ शाळांची होणार तपासणी
राज्यातील ४ हजार ३२५ शाळांचे सामाजिक लेखा परीक्षण करण्यात येणार आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील १३९ शाळांचा समावेश आहे. या शाळांमधील आहाराचा दर्जा व त्यावरील खर्चाचे लेखा परीक्षण केले जाणार आहे.
... तर कारवाई होणार
केवळ कागदोपत्री हिशेब न पाहता प्रत्यक्षात शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिला जाणारा पोषण आहार, त्याची चव, स्वच्छता, साहित्याचा पुरवठा याची प्रत्यक्ष तपासणी करण्यात येणार आहे. या योजनेतील पारदर्शकतेसाठी ऑडीट केले जाणार आहे. हे ऑडिट शिक्षण विभागातील अधिकारी न करता त्रयस्थ संस्थेच्या माध्यमातून केले जाणार आहे. ज्या शाळांमध्ये त्रुटी किंवा गैरप्रकार आढळल्यास शाळांवर संबंधित यंत्रणेवर कारवाई करण्यात येणार आहे.