रत्नागिरी : नववर्षात रेशनवरील धान्य वाटपात पुन्हा बदल करण्यात आला आहे. काही जिल्ह्यात रेशनवर ज्वारी देण्यात आली होती. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे ज्वारी आता बंद होणार आहे. पुढील महिन्यापासून प्राधान्य गटाला प्रती सदस्य तांदूळ 3 किलो, गहू 2 किलो आणि अंत्योदय योजनेत तांदूळ 20 किलो आणि गहू 15 किलो असे एकूण 35 किलो धान्य दिले जाणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये 10 लाख 20 हजार 307 प्राधान्य गटातील सदस्य तर 38 हजार 535 शिधापत्रिकाधारक अंत्योदय गटातील लाभधारक आहेत. रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यभरातील रेशनधारकांना नवीन वर्षात धान्य वाटपात नवीन नियम करण्यात आला होता. त्यानुसार प्राधान्य गटाला 3 किलो तांदूळ, 1 किलो गहू असे एकूण 5 किलो धान्य दिले जात होते. मात्र, आता नवीन वर्षात बदल करण्यात आला असून प्राधान्य कुटुंबात तांदूळ 2 किलो, 3 किलो गहू तर अंत्योदयमध्ये तांदूळ 14 लि तर 21 किलो गहू मिळणार आहे.
दरम्यान, राज्याच्या पुरवठा विभागाकडून काही जिल्ह्यांमध्ये ज्वारीचे उत्पन्न अधिक वाढल्याने रेशनवर ज्वारी दिली जात होती. मात्र, या योजनेला फारसा प्रतिसाद न मिळाल्याने आता पुन्हा बदल करून ज्वारी फेब्रुवारीपासून बंद होणार असल्याचे सांगण्यात आले.
यामुळे झाला बदल...
पुरवठा विभागाच्या वतीने नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये प्रायोगिक तत्वावर गहू, ज्वारीचे वाटप सुरू केले होते. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अनेक ठिकाणी गहू कमी आणि ज्वारी जास्त मिळाल्याने नागरिकांना अडचणी आल्या. रत्नागिरी जिल्ह्यात ज्वारीऐवजी गहूच दिला जात होता. गव्हाचे उत्पन्न वाढल्याने आता 1 किलो गहू वाढवला आहे. त्यामुळे तांदूळ 3 किलो आणि गहू 2 किलो देण्यात येणार आहे.
नवीन वर्षात गहू, तांदूळ वाटपात बदल करण्यात आला आहे. अंत्योदय कार्डसाठी एकूण 35 किलो धान्य वाटप होणार असून आता गहू 15 आणि तांदूळ 20 किलो वाटप होईल.पूर्वी गहू 10 आणि तांदूळ 25 किलो वाटप होत होते.प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांना पूर्वी गहू 1 तर तांदूळ 3 किलो देत होते आता गहू दोन आणि तांदूळ तीन किलो असे देण्यात येणार होते.रोहिणी रजपूत, जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी