पोलिस अधीक्षक नितीन बगाटे  Pudhari Photo
रत्नागिरी

Ratnagiri Police | सराईत अंमली पदार्थ विक्रेत्यांवर होणार ‘मोक्का’ची कारवाई; रत्नागिरी पोलिसांची कठोर भूमिका

अंमली पदार्थ विरोधात जनतेचा सक्रिय सहभाग आवश्यक : पोलिस अधीक्षक नितीन बगाटे

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : अंमली पदार्थ विरोधी कारवाई अधिक सक्षम आणि प्रभावी होण्यासाठी जनतेचा सक्रीय सहभाग अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत केले. "फक्त पोलिसांनी केलेली कारवाई ही एकेरी ठरते; अमली पदार्थांचा प्रश्न कायमचा संपवायचा असेल तर समाजानेही त्यांना पूर्णपणे नाकारले पाहिजे," असे त्यांनी स्पष्ट केले.

रत्नागिरी पोलिस प्रशासनाने अमली पदार्थ विक्री व तस्करीविरोधात कठोर भूमिका घेतली असून, अशा गुन्ह्यांमध्ये वारंवार गुंतलेल्या सराईत आरोपींवर आता ‘मोक्का’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) अंतर्गत गुन्हे दाखल केले जाणार आहेत. याशिवाय, ज्या आरोपींवर आधीच गुन्हे दाखल आहेत, त्यांच्यावर तडीपारीचे प्रस्तावही तयार करण्यात आले आहेत.

पोलिस अधीक्षक बगाटे म्हणाले, "अंमलीपदार्थ विक्री करणाऱ्यांची आणि पुरवठा करणाऱ्यांची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी रत्नागिरी पोलिस विभाग सातत्याने कारवाई करत आहे. गुन्हेगारांना कोणतीही माफी दिली जाणार नाही. यापुढे फक्त कारवाईच नव्हे, तर कायमस्वरूपी बंदोबस्तासाठी कठोर उपाययोजना राबवल्या जातील."

अंमली पदार्थांच्या विळख्यात तरुण पिढी अडकत असल्याने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष मोहिम हाती घेण्यात आली असून, पुरवठा करणारे नेटवर्क, स्थानिक वितरक आणि आर्थिक साखळी यांचा तपशीलवार शोध घेतला जात आहे. "अमली पदार्थ विरोधी लढ्यात समाजाचा सहभाग महत्त्वाचा आहे. जनतेने अमली पदार्थांना पूर्णपणे नकार दिला, तरच हा लढा यशस्वी होईल," असे आवाहनही पोलिस अधीक्षक बगाटे यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT