रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
रत्नागिरी जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी द मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने सुरू असलेल्या भात खरेदी प्रक्रियेने वेग घेतला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ५७४ शेतकऱ्यांनी १३ हजार ६५४ क्विंटल भाताची विक्री केली आहे. त्यातून २ कोटी ८९ लाख रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहे.
जिल्ह्यात दरवर्षी शासनाच्यावतीने हमीभावाने भात खरेदी केली जाते. यावर्षी भातविक्रीसाठी एकूण १ हजार ८५५ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. नोंदणीकृत शेतऱ्यांना त्यांचे उत्पादन विकण्यापूर्वी स्लॉट बुकिंग करणे अनिवार्य आहे.
शेतकऱ्यांनी भात विक्री केल्यानंतर त्याची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत आहे. दरम्यान, गतवर्षी भाता प्रतिक्विंटला २ हजार ३०० रुपये दर देण्यात आला होता. यावर्षी त्यात ६९ रुपयांची वाढ करून २ हजार ३६९ रुपये हमीभाव निश्चित करण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे खुल्या बाजारात तांदळाचे दर ४२ पासून १२० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत.
खुल्या बाजारातील चढ्या दरांच्या तुलनेत हमीभाव कमी असल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान यंदा भाताची उत्पादकता कमी असल्याने विक्रीसाठी येणाऱ्या भाताचे प्रमाणही काहीसे मर्यादित आहे. तरीही ३१ मार्च ही अंतिम मुदत असल्याने उर्वरित नोंदणीकृत शेतकरी आपली विक्री प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी घाई करत आहेत. ३१ मार्चपर्यंत मुदत असल्याने शेवटच्या टप्प्यात शेतकऱ्यांकडून लगबग सुरू आहे.
९ केंद्रावर खरेदी प्रक्रिया...
जिल्ह्यात १३ ते १४ केंद्रावर भात खरेदी केली जाते; मात्र यावर्षी केवळ ९ केंद्रावरच ही प्रक्रिया सुरू आहे, या केंद्रावर आतापर्यंत ५७४ शेतकऱ्यांनी १३ हजार ६५४.८० क्विंटल भाताची विक्री केली आहे. या उत्पादनाचे एकूण मूल्य ३ कोटी २३ लाख ४८ हजार २२१ रुपये इतके आहे. त्यापैकी १०६ शेतकऱ्यांच्या खात्यावर २ कोटी ८९ लाख १ हजार ८०० रुपये जमा करण्यात आले आहेत.