रत्नागिरी : शिवसेना-भाजप युतीने रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रचंड निर्णायक विजय मिळवला. त्यानंतर आता युतीच्या नेत्यांमध्ये उपनगराध्यक्ष पदासह समित्यांच्या सभापती पद वाटपाच्या वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. दोन्ही पक्षांच्या गटनेते पदाच्या निश्चितीचेही नियोजन केले जात आहे. भाजपला उपनगराध्यक्ष पदासह दोन समित्या मिळण्याची शक्यता आहे. निवडणूक काळात पालकमंत्री उदय सामंत यांनी युती भक्कम असल्याचे दाखवून दिले. समित्या वाटपातही या भक्कमतेचे प्रतिबिंब उमटणार आहे.
रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण 32 जागांपैकी 29 जागांवर विजय मिळाला. शिवसेनेला 23 आणि भाजपला 6 जागा मिळाल्या. थम्पिंग मेजॉरिटी असल्याने दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांचा योग्य समन्वय रहावा यासाठी नगर परिषदेतील गटनेते लवकरच जाहीर होणार आहेत. या पाठोपाठ उपनगराध्यक्ष आणि समित्यांचे सभापती पद वाटप निश्चित होणार आहे. यासंदर्भात पालकमंत्र्यांनी पक्षाच्या पदाधिकार्यांना शिस्तबद्धतेच्या सूचना केल्या आहेत.
रत्नागिरी नगर परिषदेमध्ये नियोजन, शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा, बांधकाम, महिला बालकल्याण आणि समाजकल्याण समित्यांसह स्थायी समिती सदस्य आहेत. यातील एक समिती उपनगराध्यक्षाकडे जाणार आहे. त्याचबरोबर समाजकल्याण सभापतिपदी शिवसेनेचे नगरसेवक विजय खेडेकर किंवा त्यांच्या सौभाग्यवती वैभवी खेडेकर यांच्याकडे राहणार आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांनी युतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत यासाठी शिवसेनेसह भाजपच्या उमेदवारांसाठी आवश्यक असणार्या मदतींसह प्रत्यक्ष प्रचारातही भाग घेतला. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर विजयोत्सव मिरवणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या नगरसेवकांसोबत भाग घेतला. युती भक्कम असल्याचा संदेश समिती सभापती वाटपातूनही देण्याची भूमिकासुद्धा मंत्री सामंत यांनी घेतली आहे. भाजपच्या नेत्यांनी नवीन पदाधिकारी निश्चितीबाबत नियोजन केले जात आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या सभापती पदांसाठीही स्वत: पालकमंत्रीच निर्णय घेणार आहेत. त्यामुळे समिती सभापती वाटपाबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये खलबते सुरू झाली आहेत.