खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेल्या लोटे एमआयडीसीवर भीषण पाणीटंचाईचे संकट कोसळले असून, पुढील ४८ तासांत अनेक उद्योग बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा करण्यास असमर्थता दर्शविल्याने औद्योगिक विकास महामंडळाकडून हात टेकले गेले आहेत. परिणामी, सुमारे २० हजार कामगारांच्या रोजगारासह परिसरातील १९ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
लोटे इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष राज आंब्रे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत हा गंभीर प्रश्न मांडला. वाढत्या पाणीटंचाईमुळे अनेक उद्योगांचे उत्पादन ठप्प होण्याच्या मार्गावर असून काही कंपन्यांनी उत्पादनात मोठी कपात करण्यास सुरुवात केली आहे. घरडा कंपनीने तर तब्बल ८० टक्के उत्पादन बंद करून केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
उद्योजकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांची भेट घेऊन तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे. नजीकच्या धरणातून टँकरद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले असले तरी उद्योगांसाठी आवश्यक पाण्याचा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. कोयना धरणाच्या अवजलावर अवलंबून असलेल्या लोटे औद्योगिक वसाहतीसाठी कायमस्वरूपी पर्याय उभारण्यात झालेल्या विलंबामुळे आजची परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप उद्योजकांनी केला आहे