Khed Panchayat Samiti Fund Controversy
खेड : पंचायत समितीच्या उपलब्ध निधीच्या विनियोगासाठी मनमानी पद्धतीने आराखडे तयार करण्यात आले आहेत. निधी वाटपात लोकसंख्येचा विचार करण्यात आलेला नाही, असा आरोप पंचायत समिती सदस्य व उबाठा शिवसेनेचे गटनेते अजय चाळके यांनी केला. याप्रकरणी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
खेड शासकीय विश्रामगृहात शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता पंचायत समिती सदस्य अजय चाळके, अमिता बडे व रेवती घाग यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी चाळके यांनी पंचायत समितीच्या कारभाराबाबत विविध आरोप केले.
चाळके म्हणाले की, पंचायत समितीत निवडून आल्यानंतर आतापर्यंत पाच सभा झाल्या असून, दि. २४ जून २०२६ रोजी पहिली सभा झाली. या सभेत उपलब्ध निधीतून सभापती व उपसभापती यांना पंचायत समितीकडे येणाऱ्या निधीतील ५० टक्के निधी देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
तसेच सेस फंड आणि १५वा वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधीच्या विनियोगासाठी आराखडे तयार करताना मनमानी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. विकासकामांचे आराखडे तयार करताना लोकसंख्येच्या प्रमाणाचा विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
“सत्तेत असताना संविधानाच्या विरोधात ठराव करून निधीचा वापर केला जात असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. याविरोधात प्रसंगी न्यायालयात दाद मागू,” असा इशाराही अजय चाळके यांनी दिला.
गटविकास अधिकारी राजकीय पक्षाच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. या संपूर्ण प्रकरणाबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संबंधित विभागांकडे तक्रारी करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख सचिन निकम, युवा सेना जिल्हाप्रमुख अजिंक्य मोरे, प्रकाश मोरे, राजू घाग, रोहित बने, राजन निर्मळ आदी उपस्थित होते.