रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्याला शनिवारी, रविवारी झोडपून काढल्यानंतर सोमवारी पावसाचा जोर काहीसा ओसरला. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी चार नद्यांच्या वाढलेल्या जलस्तराने उद्भवलेली पूरस्थिती ओसरण्यास मदत झाली. तरीही सोमवारी सकाळी काही भागात राजापूर आणि खेड तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने या दोन तालुक्यांतील अनुक्रमे जगबुडी आणि कोदवली या दोन्ही नद्या जिल्हा आपत्ती नियंत्रण विभागाच्या नोंदीनुसार इशारा पातळीवरून वाहत होत्या.
गेल्या चार-पाच दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यासह कोकण किनारपट्टी भागाला झोडपून काढणार्या पावसाचा जोर पुढील चार दिवस वाढण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात चक्रीय वार्याची जोड असलेल्या कमी दाबाच्या प्रभावाने कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर कायम राहणार आहे.
बंगालच्या उपसागारत आणि अरबी सागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या प्रणालीचा प्रभाव कायम आहे. त्यामुळे प्रामुख्याने मोसमी पावसाचा जोर (मान्सून ट्रफ) पुढील चार दिवस कायम राहणार आहे. तसेच चक्रीय वार्याची गती कमी होण्याचा अंदाज असल्याने सोमवारपासून कोकण किनारपट्टी भागात पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तरीही सतर्कता बाळगताना कोकण किनारपट्टी भागातील रायगड, रत्नागिरी या दोन जिल्ह्यात जोरदार पावसाचा ‘रेड अलर्ट’ तर मुंबईसह ठाणे, पालघऱ आणि सिंधदुर्ग जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
सोमवारी सकाळी पावसाचा जोर ओसरल्याने रविवारी धोका पातळीवर पूरस्थिती निर्माण करणारी जगबुडी नदी इशारा पातळीवर वाहात होती तर राजापूर तालुक्यातील कोदवली नदीचा जलस्तरही दुपारी 12 11 वाजता इशारा पातळीवरच असल्याने येथील बाजारपेठ भागात पूरस्थिती कायम होती. संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री आणि बावनदीतील जलस्तर उसंत घेतलेल्या पावसाने काहीसा कमी झाल्याने येथील पुरस्थितीही काहीशी ओसरली होती.
रत्नागिरी तालुक्यात वाहणार्या काजळी नदीचा पूरही ओसरल्याने येथील विस्कळीत झालेले जनजीवन काही अंशी पूर्वपदावर आले. आंजणारी नदीच्या पाण्याचे प्रमाण वाढल्याने प्रशासनाने रविवारी या पुलावरील वाहतूक बंद केली होती. त्यामुळेे तीन ते चार तासांपासून अधिक काळ मुंबई - गोवा महामार्ग ठप्प पडला. मात्र, सायंकाळनंतर पाणी ओसरल्यानंतर येथील वाहतूक नियंत्रित गतीने सुरू करण्यात आली.