खेड : मुसळधार कोसळणार्या पावसामुळे गेल्या 24 तासात पुन्हा खेड तालुक्यात हाहा:कार उडवला असून जगबुडी आणि नारंगी नद्यांनी धोक्याची पातळी पुन्हा एकदा ओलांडली आहे. तालुक्यात गेल्या 24 तासात 107.85 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. खेड - दापोली मार्गावर पाणी आल्याने मार्ग सुमारे 12 तास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
दरम्यान, तालुक्यातील तिसंगी येथे बर्गेवाडीमधील रहिवासी एका शेतकर्याचा गुरे घेऊन गेलेला असताना महावितरणच्या विजेच्या तुटलेल्या तारेला स्पर्श होऊन गाईसह मृत्यू झाला आहे. खेड शहरासह पावसाने तालुक्यात गेल्या आठ्ठेचाळीस तासांपासून हाहाकार उडवला आहे. गुरूवारी दि.18 रोजी सायंकाळी पावसाने सुरू केलेली मुसळधार संपूर्ण रात्र कायम राहिल्याने जगबुडी नदीने सकाळी धोक्याची पातळी ओलांडली. जगबुडी नदी 7.25 मीटर पातळी वरून वहात असून पावसाचा जोर कायम आहे. खेड - दापोली या मुख्य राज्य मार्गावरील एकविरा नगर या परिसरात पाणी साचल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पहाटेपासून बंद करण्यात आली आहे.
नारिंगी, जगबुडी नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहू लागल्याने वृत्त समजताच अनेक शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून लहान वर्गाना सुट्टी जाहीर केली. जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तालुक्यातील तिसंगी बर्गेवाडी येथील रहिवासी बाबू कोंडू बर्गे (80) हा आपली गाई ला घेऊन गावानजीकच घेऊन गेलेला असताना महावितरणच्या तुटलेल्या वीज वाहिनीतून प्रवाहित विजेचा धक्का बसून त्याचा व गायीचा मृत्यू झाला. सायंकाळी पावसाचा जोर ओसरल्याने नद्यांची पाणी पातळी कमी झाली असली तरी जगबुडी नदी अद्याप धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे.