देवरुख: पुढारी वृत्तसेवा: ओमानमधील जहाज दुर्घटनेत संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील समरान इब्राहिम सय्यद यांचा मृत्यू झाल्याची माहिती ओमान कंपनी ने गुरुवारी ( दि.१८) कुटुंबीयांना कळवली आहे. यामुळे कसबा गावात शोककळा पसरली आहे.
ओमान किनाऱ्यावरील शिप प्रेस्टिज फाल्कन दुर्घटनेत - क्रू समरान इब्राहिम सय्यद (कसबा- पारकर वाडा) यांचे ओमानमधील रुग्णालयात निधन झाल्याचे कळविण्यात आले आहे. अल्लाह त्यांना जन्नतुल फिरदौसमध्ये सर्वोच्च स्थान देवो आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना धैर्य देवो, असा मेसेज कंपनीने पाठविला आहे.
दोन महिन्यांपूर्वीच समरान इब्राहिम सय्यद हा ओमानमध्ये बोटीवर गेला होता. ओमान समुद्रात बुडालेल्या १३ भारतीयांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव समरान या तरुणाचा समावेश होता. ओमानच्या समुद्र किनारपट्टीवर तेलाचे जहाज उलटले. या दुर्घटनेत १३ भारतीयांसह १६ क्रू बेपत्ता झाले होते.
भारतीयांसह इतर लोकांचा अद्याप शोध लागलेला नव्हता. यात इतर तीन क्रू मेंबर्स श्रीलंकेचे होते. समरानच्या कुटुंबियांना प्रथम जहाज बुडाल्याने कंपनीकडून कळवण्यात आले होते. यानंतर गुरुवारी कंपनीने समरानचे निधन झाल्याची माहिती कळवली. यामुळे समरानच्या कुटुंबासह कसबा गावावर शोककळा पसरली आहे.