रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
मच्छीमारांचे उत्पन्न चालू मासेमारी मोसमात फारच कमी झाले आहे. त्यामुळे मच्छीमार कुटुंबांवर आर्थिक संकट आले आहे. अशावेळी जिल्ह्यात मच्छीमार दुष्काळ जाहीर करून मच्छीमारांना विशेष आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी रत्नागिरी मच्छीमार खलाशी आणि कामगार कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष समीर वस्ता यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मच्छीमारांचा गेल्या अनेक वर्षातील यंदाचा मासेमारी मोसम फारच तोट्याचा झाला. समुद्रात खचपिक्षा फारच कमी मासळी मिळाली. हवामानातील बदलामुळे माशांचे स्थलांतरण झाल्याने नौकांना मासळीच मिळेनाशी झाली.
त्यात वाढलेल्या डिझेलदरासह नौकेतील खलाशांचा खर्चही अंगावर पडला. त्यामुळे नौका मालक व मच्छीमार कुटुंबाची आर्थिक स्थिती बिघडून गेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ही एकप्रकारे मच्छीमार समाजावर पडलेली दुष्काळी परिस्थिती आहे, असे समीर वस्ता यांच्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
आर्थिक संकटात सापडलेल्या मच्छीमारांना तातडीने शासकीय मदत मिळवून द्यावी, अशी विनंती मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांना करण्यात आली आहे. मच्छीमारांना विशेष आर्थिक मदत जाहीर करावी. त्याचबरोबर डिझेल अनुदान किंवा विशेष सवलत देण्यात यावी.
मच्छीमारांसाठी कल्याणकारी योजना राबवून अनुदान दिले जावे. मासेमारी उद्योग टिकवण्यासाठी मत्स्यव्यवसायसाठी बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हफ्ते भरण्यास आणि व्याजदरावर सवलत दिली जावी, अशा मागण्याही मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.