Inter-caste Marriages Ratnagiri District  file photo
रत्नागिरी

Inter-caste Marriages Ratnagiri District - जिल्ह्यात ३ वर्षांत २५७ आंतरजातीय विवाह

विवाहित जोडप्यांना ५० हजारांचे अनुदान; जातीय भेदभाव कमी करण्यासाठी उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : जाकीरहुसेन पिरजादे महाराष्ट्र शासनाच्या आंतर जातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. बाबासाहेव आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय योजनेंतर्गत विवाहित जोडप्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजारांचे अनुदान दिले जाते. २०२३ ते २०२६ या कालावधीत २५७ पात्र लाभार्थ्यांना एकूण १२ कोटी ८५ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातर्फे आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अनुदान योजना राबविली जाते. अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमतीपैकी एक आणि दुसरी हिंदू, लिंगायत, जैन, शीख म्हणजे सवर्ण धर्मातील व्यक्ती असल्यास त्यांना आंतरजातीय विवाह योजनेचा लाभदिला जातो. अस्पृश्यता निवारणाचा एक भाग म्हणून आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली.

या योजनेला रत्नागिरी जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत असून शेकडो जोडप्यांकडून अर्ज केले जात आहे. त्याची पडताळणी, तपासणी केल्यावर लाभार्थी पात्र ठरविले जातात. शासनाकडून येणाऱ्याया निधीद्वारे ५० हजारांचे अनुदान दिले जाते. तीन वर्षात २५७ जोडप्यांनी आंतरजातीय विवाह केला असून त्यांना तब्बल १२ कोटी ८५ लाखांचे अनुदान वितरीत करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाने दिली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जोडपे महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे.

विवाह करणाऱ्या जोडप्यांपैकी एक व्यक्ती अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा, त्यांच्याकडे संबंधित जातीचा दाखला असावा, विवाह नोंदणीकृत असावा अणि विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करावे लागेल, विवाह करताना वधूचे वय किमान १८ वर्षे आणि वराचे वय २१ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

योजना लाभासाठी आवश्यक कागदपत्रे

विवाह नोंदणी प्रमाणपत्र, वर आणि वधू यांच्या शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, वर आणि वधू यांचे एकत्रित फोटो, आधार कार्ड, दोन प्रतिष्ठित व्यक्तींची शिफारसपत्रे, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा पुरावा, संयुक्त बैंक खाते तपशील.

समाज कल्याण विभागाच्या वतीने आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन मिळावे तसेच ही योजना सर्वापर्यंत पोहोचावी यासाठी प्रयत्न करणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २५७ हून अधिक जोडप्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. पात्र जोडप्यांना ५० हजारांचे अनुदान दिले जाते.

- अॅड. सुयोग कांबळे, सभापती, समाज कल्याण विभाग, रत्नागिरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT