Konkan Cashew  Pudhari
रत्नागिरी

Cashew Processing Project | काजू प्रक्रिया प्रकल्प कोल्हापूरला गेलेला नाही

Cashew Processing Project | कृषी उत्पन्न समिती सभापती संदीप सुर्वे; जागेचा शोध सुरू, गैरसमज दूर करण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

कोकणातील काजू उत्पादन आणि त्यावरील प्रक्रिया उद्योगांवरून सध्या सुरू असलेल्या राजकीय व सामाजिक उलटसुलट चर्चाना आता पूर्णविराम मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित काजू प्रक्रिया प्रकल्प शेजारील कोल्हापूर जिल्ह्यात वर्ग करण्यात आल्याची चर्चा निव्वळ अफवा असून, रत्नागिरीचा प्रकल्प जिल्ह्यातच होणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप सुर्वे यांनी सांगितले महाराष्ट्र राज्य काजू परिषदेने रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये काजू प्रक्रिया उद्योग उभारणीला मंजुरी दिली आहे.

मात्र, कोल्हापूरमध्ये जागेची उपलब्धता तातडीने झाल्यामुळे तिथे काम वेगाने सुरू झाले, तर रत्नागिरीत अद्याप २५ एकर जागेचा तिढा सुटलेला नसल्याने प्रकल्पाला विलंब होत आहे. कोकणातील हवामान व संसाधने वापरून होणाऱ्या काजू उत्पादनाचा आर्थिक फायदा स्थानिक पातळीवरच मिळावा, ही रत्नागिरीकरांची मागणी रास्त आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य काजू परिषदेने तिन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना व एमआयडीसीला आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याबाबत पत्र व्यवहार केला होता.

कोल्हापूर एमआयडीसीने या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत २५ एकर जागा तात्काळ उपलब्ध करून दिली, ज्यामुळे तिथल्या सेंटर ऑफ एक्सलन्स आणि प्रक्रिया केंद्राचा मार्ग मोकळा झाला. याउलट, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकाच ठिकाणी सलग २५ एकर जागा मिळण्यात अडचणी येत आहेत. ही प्रशासकीय दिरंगाई किंवा जागेची अनुपलब्धता म्हणजे प्रकल्प दुसऱ्या जिल्ह्यात गेला असा होत नाही.

या संदर्भात माहिती देताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप सुर्वे यांनी सांगितले की, रत्नागिरीचा हक्काचा प्रकल्प कुठेही गेलेला नसून तो जिल्ह्यातच साकारला जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी योग्य जागेचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी मनुज जिंदल हे स्वतः यासाठी विशेष लक्ष घालत असून, एमआयडीसी प्रशासन आणि जिल्हा यंत्रणेच्या माध्यमातून सलग जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

कोकणातील रानमेवा, काजू आणि स्थानिक जैवविविधतेवर आधारित उद्योगांना चालना देणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे रत्नागिरीतील जागेचा तांत्रिक प्रश्न सुटताच येथील प्रक्रिया उद्योगाला गती मिळणार आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी कोणत्याही चुकीच्या बातम्यांवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासकीय पातळीवरून करण्यात आले आहे. योग्य ब्रँडिंग, प्रक्रिया आणि स्थानिक तरुणांना रोजगार देणारा हा प्रकल्प लवकरच रत्नागिरीच्या भूमीत पाय रोवणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT