रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील सांडपाणी थेट समुद्रात सोडले जात असल्याने वाढणाऱ्या सागरी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी नगरपरिषदेमार्फत अत्याधुनिक सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी शासनाने २८ कोटी २५ लाख ६० हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून, पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागल्याचे सांगण्यात आले.
स्वच्छ भारत अभियान (शहरी) २.० अंतर्गत 'नाला इंटरसेप्शन अँड डायव्हर्शन विथ सीवेज ट्रीटमेंट प्लॅट' हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. रत्नागिरी नगरपरिषदेच्या सिटी सॅनिटेशन अॅक्शन प्लॅननुसार मंजूर झालेल्या निधीतून शहरातील सांडपाणी व मलनिःसारण व्यवस्था अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यात येणार आहे. प्रकल्पाअंतर्गत १३.८० एमएमएलडी क्षमतेचे अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) उभारण्यात येणार असून, त्यासाठी १६ कोटी १४ लाख ६० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या केंद्रात शहरातील सांडपाण्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केल्यानंतरच ते समुद्रात सोडण्यात येणार आहे. याशिवाय, सांडपाण्याचा योग्य निचरा सुनिश्चित करण्यासाठी ५.५ किलोमीटर लांबीच्या नाल्यांचे इंटरसेप्शन व डायव्हर्शन करण्यात येणार असून, त्यासाठी २ कोटी ७५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तसेच शहरातील विविध भागांतील सांडपाणी प्रक्रिया केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी २५.२ किलोमीटर लांबीचे सीवर नेटवर्क उभारण्यात येणार असून, या कामासाठी १० कोटी ६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या प्रकल्पामुळे शहरातील सांडपाण्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावली जाणार असल्याने समुद्रातील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर शहरातील स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनालाही मोठी चालना मिळणार आहे. रत्नागिरीतील सांडपाणी व्यवस्थापनाची समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. या प्रकल्पामुळे ती कायमस्वरूपी मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, शासनाने निधी मंजूर केल्याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
समुद्रात जाणारे सांडपाणी आता प्रक्रिया करूनच सोडणार
रत्नागिरी शहरातील सांडपाणी यापुढे प्रक्रिया करूनच पुढे सोडले जाईल. त्यामुळे सध्या होत असलेल्या सागरी प्रदूषणाला मोठ्या प्रमाणात आळा बसेल. या प्रकल्पासाठी शासनाने सुमारे २९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, लवकरच कामाला सुरुवात होईल," अशी माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.