Rajapur Arjuna Dam
राजापूर: राजापूर तालुक्याच्या पूर्व परीसरातील महत्वपूर्ण असलेला करक गावातील अर्जुना पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून त्या प्रकल्पच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. दरम्यान प्रकल्प परीसरातील जनतेने सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना तालुका प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
तालुक्याच्या पूर्व परीसरात करक येथे ल. पा. विभागाचा पाटबंधारे प्रकल्प असून अर्जुना प्रकल्प या नावाने ओळखला जातो. मागील काही वर्षे हा प्रकल्प पावसाळी दिवसात पूर्ण क्षमतेने भरत असून यावर्षी देखील सुरु असलेल्या पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरला आहे. दरम्यान प्रकल्पाच्या सुरक्षिततेसाठी सोमवारपासून सांडव्यावरून २.४१ क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याची माहिती ल. पा. विभागाच्या वतीने देण्यात आली.
त्यामुळे धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने धरण व अनुषंगिक भागात प्रवेश निषिद्ध करण्यात आलेला आहे. तसेच धरणावर सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्र, नाले तसेच धरणाच्या परिसरात प्रवेश करू नये अशा सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
राजापूर तालुक्यातील सर्वात मोठा ल पा प्रकल्प म्हणून अर्जुना प्रकल्पची ओळख असून त्या प्रकल्पातून बंदिस्त पाईपलाइनचे काम मोठया प्रमाणात मार्गी लागले आहे. पूर्व परीसरातील जनतेला विविध कारणासाठी मुबलक प्रमाणात पाणी मिळावे, हा शासनाचा मुख्य उद्देश आहे.
आजची धरणस्थिती :
अर्जुना मध्यम प्रकल्प, ता. राजापूर, जि. रत्नागिरी
पाणीपातळी : १७७. ०५ मी.
उपयुक्त पाणीसाठा : ७२. ५६ द.ल.घ.मी.
साठा : १००%
आजचा पाऊस : ७४ मिमी
१ जून २०२६ पासून एकूण पर्जन्यमान : २००१ मिमी
सांडवा विसर्ग : २.४१क्युसेक्स
विमोचक विसर्ग : ०. ०० क्युसेक्स