खेड : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात ६ एप्रिल रोजी दणदणीत मोर्चा काढण्यात आला. शासकीय यंत्रणा, आमदार, खासदार, पालकमंत्री यांच्याविरोधात आंदोलकांनी आक्रमकपणे हल्लाबोल केला आणि पीफास उत्पादन बंद केले नाही म्हणून निषेधही व्यक्त केला.
जोपर्यंत पीफास (फॉरएव्हर केमिकल) चे उत्पादन थांबत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, अशी घोषणा उपोषणकर्ते अशोक जाधव व राजेंद्र आंब्रे यांनी या मोर्चात केली. लोटे येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत सकाळी १० वाजता आंदोलक जमू लागले.
त्यानंतर श्रीफळ फोडून जोरदार घोषणाबाजी करत मोर्चाला सुरुवात झाली. कोकणची माय पीफासला नाय, लक्ष्मी कंपनी बंद झालीच पाहिजे, लोकप्रतिनिधींचा जाहीर निषेध अशा घोषणा देण्यात आल्या. यानंतर हा मोर्चा लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीच्या दिशेने काढण्यात आला. विघटन न होणारे पीफास उत्पादन तत्काळ बंद करावे, प्रदूषणकारी कंपनी कायमस्वरूपी बंद करावी, या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलकांनी घोषणाबाजी केली.
दखल न घेतल्यास वेगळ्या पद्धतीने आंदोलन !
या आंदोलनात सक्रिय सहभाग असलेले उदय घाग यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले. ही आंदोलनाची पहिली पायरी आहे. पुढे हे आंदोलन अधिक तीव्र होईल. कंपनी व्यवस्थापन किंवा शासनाने या आंदोलनाची योग्य दखल न घेतल्यास वेगळ्या पद्धतीने आंदोलन करावे लागेल. कोकणचा विनाश करणारा किंबहुना माणसाच्या आयुष्यावर उठलेले पीफास येथून हद्दपार करायचा आहे. शासनाने २० एप्रिलपर्यंत आमच्या पत्राला योग्य ते उत्तर न दिल्यास हे आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशारा उदय घाग यांनी दिला.