मुंबई-गोवा महामार्ग 
रत्नागिरी

येवा कोकण आपलोच असा.. खड्ड्यांचो पण

चाकरमान्यांनी धरली गावाकडची वाट...

पुढारी वृत्तसेवा
दीपक कुवळेकर

रत्नागिरी : गणेशोत्सवाला काही तास उरले असताना बाप्पाच्या आगमनासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी गावाकडे निघाले आहेत. गुरुवारी सकाळपासून चाकरमान्यांनी गावची वाट धरली आहे. पण सध्या मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था बघितली तर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत आहे. शासनाने यावर्षी चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होईल असे आश्वासन दिले होते. मात्र, यावर्षी पण खड्डे चाकरमान्यांच्या नशिबातच असल्याचे दिसत आहे. सध्या महामार्गावर वाहतूक कोंडी बघायला मिळत आहे. प्रशासनाने चाकरमान्यांच्या स्वागतासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. येवा कोकण आपलोच असा.. पण खड्ड्यांचो पण असा.. अशी म्हणण्याची वेळ प्रत्येक चाकरमान्यांवर आली आहे.

गणेशोत्सव आणि होळीला कोकणी माणूस गावी जाणार म्हणजे जाणारच. रजा मिळो अथवा न मिळो पण 8 दिवस गावाकडे गेल्याशिवाय कोकणी माणसाचे समाधान होत नाही. यंदाही लाखो चाकरमानी गणेशोत्सवासाठी गावाकडे जायच्या तयारीत असून, काहीजणांनी गुरुवारपासूनच गावची वाट धरली आहे. पण, सध्या महामार्गाने येणार्‍या चाकरमान्यांची अवस्था बिकट बनली आहे. गेली अनेक वर्षे या महामार्गाचे काम सुरूच आहे. तब्बल 15 वर्षांपेक्षा जास्त कालावधी होऊनसुद्धा महामार्ग अजून पूर्ण नाही, ही कोकणवासीयांसाठी शोकांतिकाच आहे.

चाकरमान्यांची सध्या येण्यास सुरुवात झाली असून खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वेगही मंदावला आहे. जिथे प्रवासाला 8 तास लागतात तिथे 14 तास किंवा त्यापेक्षा अधिक तास लागत आहेत. यामुळे चाकरमानी हैराण झाले आहेत. ठिकठिकाणी खड्डेच पहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामार्गाची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी एक बाजू पूर्ण होईल, असे सांगितले होते. परंतु एक बाजू सोडा खड्डेही बुजवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हे आश्वासन आश्वासनच ठरले आहे.

महामार्गावर मदत केंद्र

कोकणात दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. यासाठी लाखोंच्या संख्येने चाकरमानी आपल्या गावाला दाखल होतात. सध्या पाऊस सुरू झाला आहे. तर काहीवेळा ऊन - पावसाचा खेळ असल्याने वातावरणात बदल झाला आहे. याचा फटका आरोग्यावर होत असून सध्या जिल्ह्यात सर्दी, ताप, डेंग्यू, मलेरिया याची साथ पसरली आहे.

साथीच्या पार्श्वभूमीवर येणार्‍या चाकरमान्यांची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला असून विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. येणार्‍या चाकरमान्यांची आरोग्य तपासणी केली जाणार असून त्यांच्यावर त्वरित प्राथमिक उपचार केले जाणार आहेत. यासाठी 22 ठिकाणी आरोग्य पथकं तैनात करण्यात आली आहेत. ही पथकं 17 सप्टेंबरपर्यंत असणार आहेत. परतीच्या प्रवासातही चाकरमान्यांची तपासणी केली जाणार आहे.

खेडमध्ये पाच ठिकाणी ही पथकं असणार आहेत. हॉटेल अनुसया, हॅप्पी धाबा, भोस्ते घाट, भरणे नाका, खेड रेल्वे स्टेशन, चिपळूण : सवतसडा पेढे, कळंबस्त फाटा, बहाद्दूरशेख नाका, अलोरे घाटमाथा, सावर्डे, चिपळूण रेल्वे स्टेशन, संगमेश्वर : आरवली, संगमेश्वर एसटी स्टॅण्ड, वांद्री, मुर्शी, संगमेश्वर रेल्वे स्टेशन, रत्नागिरी : हातखंबा तिठा, पाली, रत्नागिरी रेल्वे स्टेशन, लांजा : वेरळ, कुवे गणपती मंदिर, राजापूर : जकातनाका असे एकूण 22 ठिकाणी पथकं तैनात करण्यात आली आहेत. 108 व 102 रुग्णवाहिका याठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. या आरोग्य कर्मचार्‍यांबरोबरच पोलिसही तेथे असणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT