रत्नागिरी : वापरा आणि फेकून द्या पद्धतीचे राजकारण करणार्या उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला बाजूला करून मनसेला जवळ केले असेल, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. पण मग आता त्यांच्या महाविकास आघाडीला श्रद्धांजली द्यायची का, असा खोचक टोला राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री ना. नितेश राणे यांनी लागवला आहे.
जयगड बंदराच्या दौर्यावर आलेल्या मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर परखड मते मांडली. यावेळी त्यांनी शिवसेना उबाठा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजकारणावर टीका करत महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मंत्री राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे नेहमीच सोयीचे राजकारण करत असतात. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या मदतीने खासदार निवडून आणल्यानंतर आता त्यांना महाविकास आघाडीऐवजी मनसेसोबत जायचे असल्यास त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. हीच त्यांची वापरा आणि फेकून द्या, अशी पद्धत आहे.
अलीकडेच मातोश्रीवर त्यांना भेटायला गेलेल्या काँग्रेस नेत्यांनाही त्यांनी भेट नाकारली. काँग्रेस नेते बंटी पाटील यांना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते करायचा प्रस्तावही उद्धव ठाकरे यांनी धुडकावून लावला असून, त्यांना अनिल परब यांना हे पद द्यायचे आहे, असेही राणे म्हणाले. मनसेच्या जवळ गेल्यामुळे शिवसेनेला काँग्रेस दूर करत असेल तर तो त्यांचा अंतर्गत विषय आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी नितेश राणे म्हणाले, राज्यातले सरकार हिंदूवादी विचारांचे असून, ते हिंदू समाजाने निवडून दिलेले आहे असेही ते म्हणाले. जिहादी या राज्यात आधी भाषेच्या माध्यमातून, आता जातीच्या माध्यमातून हिंदूंचे विभाजन करण्याचे षडयंत्र करत आहे, मात्र देवेंद्र फडणवीस हे कडवट हिंदुत्ववादी आणि सक्षम मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या राज्यात कुठल्याही हिंदूंवर अन्याय होणार नाही, असे? ? सांगत ना. राणे यांनी ओबीसी आरक्षणाला कोणताही धोका पोहोचणार नाही, असेही स्पष्ट केले.
कोकणच्या विकासावर बोलताना ना. राणे यांनी सांगितले की, कोकणामध्ये रोजगार आणि नोकर्या आल्या पाहिजेत. तरुण-तरुणींनी मुंबई, पुणे, येथे न जाता आपल्या गावीच राहून काम केले पाहिजे,? ? म्हणूनच रोजगार देणार्या प्रकल्पांना कोकणवासीयांनी समर्थन दिले पाहिजे. मागील दहा वर्षांतील उबाठाच्या घाणेरड्या राजकारणामुळेच कोकण मागे पडले आहे, मात्र यापूर्वी मातोश्रीवरून सुरू असलेले नकारात्मक राजकारण जनतेने नाकारले असून, जनतेने रोजगार आणि विकासासाठी भाजप-महायुतीला निवडून दिले आहे. त्यामुळे रोजगार वाढवणारे प्रकल्प पर्यावरणाची काळजी घेऊन पुढे नेले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.