Rajapur ST Depot Traffic
राजापूर : राजापूर एसटी डेपोसमोरील राष्ट्रीय महामार्गावर वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांचा वाढता धोका लक्षात घेता तातडीने आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबविण्याची मागणी राजापूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष विनय गुरव यांनी आमदार किरण सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, एसटी डेपोसमोरील राष्ट्रीय महामार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे हा परिसर अपघातप्रवण बनला असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. विशेषतः गुरववाडी व बंगलवाडी परिसरातील नागरिक, तसेच एसबीआय, बँक ऑफ महाराष्ट्र, एचडीएफसी बँक आणि राजापूर अर्बन बँकेत ये-जा करणारे ज्येष्ठ नागरिक, पेन्शनधारक आणि ग्राहक यांना महामार्ग ओलांडताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एसटी डेपो परिसरात चारचाकी वाहनांचीही वाहतूक होऊ शकेल असा उड्डाणपूल उभारण्यात यावा, संबंधित जंक्शनवर आधुनिक वाहतूक सिग्नल बसविण्यात यावेत, तसेच जंक्शनपूर्वी वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी वेगमर्यादा दर्शविणारे कॅमेरे व अन्य यंत्रणा कार्यान्वित करण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
नागरिक आणि वाहनचालकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाने या सर्व मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा उपनगराध्यक्ष विनय गुरव यांनी व्यक्त केली आहे. स्थानिक नागरिकांची दैनंदिन सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी निवेदनात अधोरेखित केले आहे.