कोकणातील १५ किनारी गावांत कांदळवन पर्यटन झोन विकसित करण्यात येणार आहे.  Pudhari Photo
रत्नागिरी

कोकणातील १५ किनारी गावांत कांदळवन पर्यटन झोन

पुढारी वृत्तसेवा

राजेंद्र पाष्टे

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीलगत विस्तीर्ण कांदळवन पट्टयाचे संरक्षण आणि संवर्धनासाठी पर्यटनाच्या नव्या संकल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी कोकणातील १५ किनारी गावांमध्ये पर्यटन झोन विकसित करण्यात येणार आहेत. त्यापैकी रत्नागिरी तालुक्यातील पावस आणि नाचणे येथे हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरूही करण्यात आला आहे. उर्वरित गावांतही या प्रकल्पाच्या कामांना वेग आला आहे. या गावातून पक्षी निरीक्षण, कांदळवन अभ्यास, कांदळवन नौका सफर आदींद्वारे पर्यटकांना आकर्षित करताना स्थानिकांना पर्यटनाद्वारे उपजीविकेचे साधन निर्माण करण्यात येणार आहे.

कांदळवन कक्ष, वन विभाग महाराष्ट्र राज्य व कांदळवन प्रतिष्ठान यांच्या सहाय्याने कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजनेंतर्गत कोकणातील किनारी गावांमध्ये कांदळवन सहव्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समितीतर्फे किनारी गावातील खाडीक्षेत्रात दुर्लक्षित असलेले कांदळवन पर्यटन झोन विकसित करण्यात येणार आहे. रत्नागिरी तालुक्यात नाचणे येथील काजळी आणि गौतमी नदीच्या खाडी क्षेत्रात हा प्रकल्प राबविला जाणार आहे.

कोकणातील १,५७५ हेक्टर कांदळवन क्षेत्र राखीव

कोकण किनारपट्टीतील सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि मुंबईतील अंधेरी-बोरिवली जिल्ह्यातील १,५७५ हेक्टर कांदळवन क्षेत्र 'राखीव क्षेत्र' म्हणून घोषित केले होते. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३७४.५ हेक्टर, रायगड ३९२, बोरिवलीतील १८२.९, अंधेरीतील ७० हेक्टर आणि ठाण्यातील ५५४.७ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. या क्षेत्राला राखीव क्षेत्राचा दर्जा देण्यासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. या क्षेत्रात पर्यटनाच्या माध्यमातून उपजीविकेची साधने निर्माण करताना कांदळवन पर्यटन क्षेत्राची निर्मिती करण्यात येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT