रत्नागिरी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे 400 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून, शाळा अद्ययावत बनवण्याबरोबरच रस्ते, गटारे, नाले यातून केले जाणार असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. या विकासकामानंतर शहराचा चेहरामोहरा बदलून जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ना. सामंत म्हणाले, रत्नागिरी शहर स्मार्ट सिटी व्हावी यासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. एमआयडीसीने तळोजा शहर दत्तक घेऊन त्याचा विकास स्मार्ट सिटी म्हणून केला आहे. याच धर्तीवर रत्नागिरी शहर स्मार्ट शहर व्हावे, यासाठी 400 कोटींचा निधी मंजूर केला आहे. रत्नागिरीत स्टरलाईट, वाटद, रीळ-उंडी, राजापूर आदी ठिकाणी औद्योगिक क्षेत्र जाहीर झाले आहे. ज्या शहरालगत मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र आहे, त्या शहराचा विकास एमआयडीसीमार्फत होतो. त्या अनुषंगाने रत्नागिरी शहराचा स्मार्ट सिटी म्हणून विकास केला जाणार आहे. यामध्ये शाळा, रस्ते, ड्रेनेज सिस्टीम आदींचा समावेश आहे. या कामांमुळे रत्नागिरी शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे, असे ना. सामंत म्हणाले.
कोकण रेल्वेच्या चिपळूण, संगमेश्वर, राजापूर या स्थानकांचा नव्याने विकास करण्यात आला आहे. याचे उद्घाटन दि. 1 ऑक्टोबर रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकाचेही सुशोभिकरणाचे काम वेगाने सुरु आहे. त्याचप्रमाणे स्थानकाच्या आतील प्लॅटफॉर्म व अन्य सोयी सुविधांचेही एमआयडीसीच्या माध्यमातून नूतनीकरण केले जाणार आहे. दि. 4 ऑक्टोबर रोजी शहरातील किल्ला येथील शिवसृष्टी व कॅशलेस हॉस्पिटलचे लोकार्पण होणार आहे. पत्रकार भवनासाठीही 1.36 कोटीचा निधी मंजूर असून 5 ऑक्टोबर रोजी त्याचे भूमिपूजन होणार आहे. एमआयडीसीच्या याच भागात कम्युनिटी हॉलच्या कामाचा शुभारंभ होणार आहे. शहराचे ग्रामैदवत श्रीदेव भैरी मंदिरासाठी तीन कोटी तर राजिवडा येथील काशिविश्वेश्वर मंदिरासाठी 1 कोटीचा निधी देण्यात येणार असल्याचेही ना. सामंत यांनी सांगितले.