निधी वाटपावरून आता महायुतीत वाद नाही : ना. भरत गोगावले  Pudhari File Photo
रत्नागिरी

Mahayuti Politics | निधी वाटपावरून आता महायुतीत वाद नाही : ना. भरत गोगावले

चिपळूण येथील वाशिष्ठी मिल्क प्रकल्पाची केली प्रशंसा

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : आता आमचं ठरलं आहे. निधी वाटपावरून महायुतीमध्ये कोणताच वाद नाही. आता नव्याने निवडून आलेल्या आमदारांना पहिल्या टप्प्यात जास्तीत जास्त निधी देण्यात येईल, असे महायुतीमध्ये ठरल्याचे फलोत्पादन व रोजगार हमी खारभूमी मंत्री भरत गोगावले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मंत्री भरत भोगाले आज चिपळूण येथे खाजगी दौर्‍यावर आले होते. त्यांनी पिंपळी येथील वाशिष्ठी मिल्क प्रोजेक्टला दुपारी भेट दिली. यावेळी भाजप नेते प्रशांत यादव यांनी मंत्री भरत गोगावले यांचे स्वागत केले. या प्रसंगी चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी सपना यादव, संचालक स्मिता चव्हाण, अ‍ॅड. नयना पवार, रामदास राणे, विजय चितळे व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना गोगावले म्हणालेकोकणात वाशिष्टी दूध हा प्रकल्प यशस्वी होत आहे. पन्नास हजार लिटर दुधावर प्रक्रिया या प्रकल्पातून करण्यात येत आहे. त्यामुळे उद्योजक प्रशांत यादव यांनी कोकण विकासाचे घेतलेले काम कौतुकास्पद आहे. त्यांना आपण सहकार्य करू हा प्रकल्प पाहण्यासाठी आपण आलो आहोत आणि हे सर्व पाहिल्यावर खूप आनंद झाला असे उद्गार काढले.

गोगावले पुढे म्हणाले की, महायुतीमध्ये निधी वाटपावरून कोणताही वाद नाही. भाजपबरोबर प्रथम शिवसेनेने युती केली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना आम्हाला भरभरून निधी मिळाला. प्रचंड प्रमाणात मतदारसंघात निधी आला. त्यामुळे आता संयमाने घ्यायचे ठरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिंदे गटात देखील निधीवरून कोणताही वाद नाही. यावेळी प्रथमच निवडून आलेल्या नव्या आमदारांना पहिल्या टप्प्यात जास्तीचा निधी द्यायचे, असे ठरले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आगामी निवडणुकासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, लोकसभा, विधानसभा आम्ही महायुती म्हणून लढली. त्यामुळे आगामी निवडणुका देखील नेत्यांमध्ये समन्वय राखून महायुतीनेच लढल्या जातील. मात्र, कोठे अडचण असेल अशा अपवादात्मक ठिकाणी निर्णय होईल. आमची पण त्यासाठी तयारी आहे, असे सांगितले.

रायगडचे पालकमंत्री पद आपल्यासाठी प्रतीक्षेत आहे. या मुद्यावर बोलताना मंत्री गोगावले म्हणाले की, आपल्यासाठी पालकमंत्री पद महत्त्वाचे नाही. पालकमंत्री असले काय नसले काय आपण काम करणारा कार्यकर्ता आहोत. काम करणार्‍या कार्यकर्त्याला पदाची गरज नसते. परंतु, पालकमंत्री पद आमचे हक्काचे आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमध्ये शिंदे शिवसेनेचे आठ आमदार आहेत तर राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत. हे गणित लक्षात घेता पालकमंत्री मिळणे हा आमचा हक्क आहे. मंत्रीपद दिले आहे. बघू आता नेते प्रयत्न करत आहेत. कदाचित नवरात्र उत्सवानंतर पालकमंत्री पद मिळेल. त्यासाठी आपण देवीला साकडे घालू. देवीने आमचे ऐकले तर पालकमंत्री पद मिळेल. त्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असे त्यांनी सूचक विधान केले. ज्या महिलांनी आम्हाला निवडून दिले त्या लाडक्या बहिणींना आम्ही विसरणार नाही. त्यामुळे ही योजना बंद पडणार नाही, असे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT